अखेर दुकान बंदचा निर्णय संवादातून मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:20+5:30

जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर बुधवारी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्यावतीने कारवाई करीत २२ दुकाने सील केली.

Finally, the decision to close the shop | अखेर दुकान बंदचा निर्णय संवादातून मिटला

अखेर दुकान बंदचा निर्णय संवादातून मिटला

ठळक मुद्देसंघटनेसोबत प्रशासनाने केली चर्चा: २२ प्रतिष्ठानांवर केली होती कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संचारबंदी असतानाही दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून दिली. तसेच सोशल डिस्टन्सिगचेही उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी शहरातील २२ दुकानांना सील ठोकले होते. यात दुकानदारांचा दोष नसल्याचे सांगत वर्धा मर्चंट असोसिएशनने दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, प्रशासनाने वर्धा मर्चंट असोसिएशनशी संवाद साधत यावर तोडगा काढला. त्यामुळे दुकानदारांकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर बुधवारी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्यावतीने कारवाई करीत २२ दुकाने सील केली. पण, दुकानदारांनी या कारवाई विरोधात दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रशासनाने वर्धा मर्चंट असोसिएशनशी संवाद साधत या आणीबाणीच्या काळात दुकाने बंद ठेवणे उचित नसून हा निर्णय मागे घेण्यास सांगितले. त्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. योग्य त्या सोयीही दुकानदार ठेवत आहे मात्र, काही ग्राहक सूचनांचे पालन करीत नाही. त्यांना वारंवार सांगुनही ते ऐकत नसेल तर त्यात दुकानदारांचा काय दोष, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यामुळे सील ठोकण्याची कारवाई मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शेवटी प्रशासनानेही संघटनेचे ऐकून घेत प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारुन दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. आता यापुढे नियम न पाळणाºया ग्राहकांना २०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

अशा कठीण काळात सहकार्य करण्याची आमचीही भूमिका आहे. आजचा बंद प्रतिकात्मक होता. शुक्रवारी बाजारपेठ बंद असते. मात्र जनतेच्या हितासाठी शुक्रवारीसुध्दा दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या सोयीकरिता सर्व सहकार्य करीत आहे. त्यामुळे ग्राहकांनीसुध्दा नियम पाळावेत.
इद्रिस मेमन, सचिव वर्धा मर्चंट असोसिएशन

Web Title: Finally, the decision to close the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.