महिनाभरात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:21+5:30
बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.

महिनाभरात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या
चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सरकारने कर्जमाफी जाहीर केली. हमीभाव देत असल्याचा दावाही केला जात आहे. बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.
मोदी सरकारने निवडणुकांपूर्वी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी विविध आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अस्मानी आणि सुल्तानी संकटांना तोंड देत बळीराजा जे काही पिकवतो, त्याला कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य कधीही मिळत नाही. गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, पाणीटंचाई अशा विविध संकटांना तोंड देत पिकविलेला भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असेल, तर ते शेतकऱ्यांसाठी संतापजनक ठरणे स्वाभाविक आहे. सरकारने शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी योजना आदी विविध योजना आणल्या. आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी सापडला असताना सध्या शेतकरी विविध योजनांच्या सभोवताल घिरट्या घालताना दिसून येतो. मागीलवर्षी कोरडा दुष्काळ आणि आता ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. ओल्या दुष्काळाने शेतकºयांनी दुबार, तिबार पेरणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली. यात शेतकरी मेटाकुटीला आला. शेतीच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांना संसाराचा गाडा कसा हाकावा, याची चिंता पडली आहे. यातच बँकांचे कर्ज कसे फेडावे, याच विवंचनेत ते राहतात. सरकारने जरी शेतकºयांच्या हिताच्या योजना आणल्या पण, याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांची फरपट होतानाच दिसत आहे.
जानेवारी महिन्यात गिरड येथील शेतकरी प्रमोद नासुराम मेश्रे (३५), अनिल प्रल्हाद गावंडे (३५) रा. वायगाव, कैलास पंडितसिंह चव्हाण (४२) रा. मोई, चिरकुट रामराव कोटकारे (५५) रा. उमरी ता. कारंजा, अनिल पंजाबराव ईवनाते (३२) रा. बेलगाव, मारोती ज्ञानेश्वर सोनटक्के (३२) रा. पानवाडी, देवराव चंपतराव मेंढे (६६) रा. लोणी या आठ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली.