भूयारी पांदण मार्गासाठी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:01 IST2019-01-21T00:00:23+5:302019-01-21T00:01:50+5:30
चार पदरी राष्ट्रीय महामार्गचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले जात आहे. परंतु, रस्ता बांधकामादरम्यान इंदिरानगर ते एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न देण्यात आल्याचा आरोप करीत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

भूयारी पांदण मार्गासाठी शेतकरी आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : चार पदरी राष्ट्रीय महामार्गचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले जात आहे. परंतु, रस्ता बांधकामादरम्यान इंदिरानगर ते एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न देण्यात आल्याचा आरोप करीत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सदर आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले, हे विशेष.
आंदोलनकर्त्यांचा रोष लक्षात घेवून रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. शिवाय आंदोलनकर्त्यांनी बिल्डकॉन कंपनीचे मालवाहू अडविण्यात आले होते. शासकीय दस्ताऐवजानुसार स्थानिक इंदिरानगर ते एकपाळा या १०० फुट रूंदीच्या पांदण रस्त्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या पांदण रस्त्यावर अनेक कास्तकारांच्या शेती आहे. त्यामुळे परंपरागत शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच एकपाळा देवस्थान व इतर गावांना जोडणारा रस्ता असून सदर मार्गावर भुयारी मार्ग न देता रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. याबाबत अनेकदा खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देत योग्य कार्यवाहीची मागणी करण्यात आली. परंतु, समस्या निकाली काढण्यात आली नाही. बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी मनमर्जी धोरण राबवित सदर काम करीत आहेत. शिवाय ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न दिल्यास परिसरातील शेतकऱ्यांना ५ कि.मी. अंतराचा फेरा घेवून शेती करावी लागणार आहे. त्यातच भुयारी मार्ग न झाल्यास १०० फुट रूंदीच्या या पांदण रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण होवून हा रस्ताच संपुष्टात येण्याचे चित्र निर्माण झाले आहे. आपआपल्या शेतातून पांदण रस्त्यावर आल्यानंतर शेतमालाची वाहतूक करावी लागत असल्याने हा मार्ग महत्वपूर्ण ठरला आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून वेळ काढू धोरण अवलंबले जात आहे. प्रशासनाने हेकेखोरीची भूमिका सोडून तोडगा काढावा अन्यथा भुयारी मार्गासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनात माजी नगराध्यक्ष अब्दुल जब्बार, शिवसेना शहर प्रमुख महेश जोशी, रवी कारोटकर, छोटू देशमुख, गणेश गिरडे, मोहन ढाकरे, महादेव पाटील, अशोक डाखोरे, मोहन ढाकुलकर, प्रमोद कारोटकर, गंगाधर कारोटकर, सचिन वैद्य, रूपेश ठाकरे, राजेश इंगोले, गणेश सुरकार, हबीब खान पठाण, सुरेश कामडी, सुभाष जयपुरकर, गजानन कारोटकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. सदर प्रकरणी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाºयांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.