मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून शेतकरी करतोय पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:26+5:30
कारंजा (घा.) तालुक्यातील नारा येथील शेतकरी रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी सन २००८ मध्ये पीककर्ज घेतले. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि निसर्गानेही साथ न दिल्याने तेव्हापासून ते कर्जाची परतफेड करू शकले नाही. सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष लाभ या शेतकऱ्याला मिळाला नसल्याने बँकेनेही पुन्हा शेतीसाठी कर्ज दिले नाही.

मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून शेतकरी करतोय पेरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकटातही शेतकरी जगावा असे धोरण राज्य सरकार राबवित असले तरी कर्करोगाने मुलाचा मृत्यू झाल्याचे दु:ख बाजूला सारुन साध्या बियाण्यांच्या खरेदीसाठी पत्नीचे दागिणे शेतकऱ्याला गहाण ठेवून पेरणी करावी लागल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे शासनाच्या योजना नावालाच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारंजा (घा.) तालुक्यातील नारा येथील शेतकरी रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी सन २००८ मध्ये पीककर्ज घेतले. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि निसर्गानेही साथ न दिल्याने तेव्हापासून ते कर्जाची परतफेड करू शकले नाही. सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष लाभ या शेतकऱ्याला मिळाला नसल्याने बँकेनेही पुन्हा शेतीसाठी कर्ज दिले नाही.
कसेबसे स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट भरणे सुरू असताना मुलाला कर्करोगाने ग्रासले. याच आजाराने मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या उपचारासाठी हातचा मोठा पैसाही निघून गेला. अशातच नवीन खरीप हंगाम तोंडावर असताना पूर्वीचे कर्ज फेडले नसल्याने बँकही पीककर्ज देण्यास तयार नाही. परिणामी, बियाणे आणावे कुठून असा प्रश्न सतावत असताना या शेतकऱ्याने पत्नीचे दागिणे गहाण ठेऊन बियाण्यांसह खताची खरेदी करून कपाशीच्या पेरणीला सुरूवात केली आहे.
स्वत:च ओढतो काकरी
पत्नीचे दागिणे गहाण ठेऊन बियाणे व खताची खरेदी करण्यात आली. पण आता बियाण्यांची लागवड करण्यासाठी बैलजोडी नसल्याने आणि किरायाने आणलेल्या बैलजोडीचा मोबदला देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी रमेश याने स्वत: काकरी बनवली. शिवाय तो ही काकरी स्वत: ओढून पत्नी व पुतण्याच्या सहाय्याने कपाशीची लागवड करीत आहे.