टिळकांच्या पुतळ्याचाही गुदमरत असेल श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:40+5:30

पावसाळापूर्व नियोजनासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम शहरातील नाले, गाळ उपसा आदी मोहीम राबविण्यात येत असली तरी गोलबाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे मात्र, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांकडून पुतळ्यासमोरच कचरा फेकल्या जातो, पाण्याचे डबके साचले असून जनावरे पाण्यात बसून असतात.

Even the statue of Tilak will be suffocating! | टिळकांच्या पुतळ्याचाही गुदमरत असेल श्वास!

टिळकांच्या पुतळ्याचाही गुदमरत असेल श्वास!

ठळक मुद्देगोल बाजारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य : पालिकेची ‘हाताची घडी तोंडावर बोट’

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील गोल बाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्या सभोवताल सर्वत्र घाणीचे साम्रज्य पसरले असून नगर पालिकेची ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमीका दिसून येत आहे. साचून असलेल्या कचऱ्यामुळे टिळकांचाही श्वास गुदमरत असेल, असे चित्र पहावयास मिळत आहे.
पावसाळापूर्व नियोजनासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम शहरातील नाले, गाळ उपसा आदी मोहीम राबविण्यात येत असली तरी गोलबाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे मात्र, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांकडून पुतळ्यासमोरच कचरा फेकल्या जातो, पाण्याचे डबके साचले असून जनावरे पाण्यात बसून असतात. असे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. एरव्ही शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन करणाऱ्या नगर पालिकेला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. गोल बाजार परिसरातून जाताना दुर्गंधी येत असलेल्या बाजारात जाणाऱ्यांना नाकावर रुमाल ठेवून भाजी खरेदी करावी लागत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजीविक्रेतेही आपला सडलेला, कुजलेला भाजीपाला टिळकांच्या पुतळ्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत फेकत असल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. कचरा फेकणाऱ्यांना कुणाचीही भीती नसल्याचे चित्र आहे. हम करे सो कायदा याप्रमाणे भाजीविक्रेत्यांकडून सर्रास कचरा फेकल्या जात आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिका प्रशासनाने जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे.

कचरा साचल्याने परिसराची साफसफाई करा
गोल बाजार परिसरात असलेल्या टिळक पुतळा परिसरात नागरिक लघुशंकेला जातात. तसेच साचून असलेला कचरा कुजून सडलेल्या भाजीपाल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पुतळा परिसरात साफसफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जयंती, पुण्यतिथीलाच येते जाग
नगर पालिका प्रशासनाला केवळ टिळकांच्या जयंती आणि पुण्यतिथीलाच जाग येत असून त्याच दिवशी पुतळा परिसरात साफसफाई करून पुतळा स्वच्छ करण्यात येतो, पण त्यानंतर पालिकेला पुतळा आणि सभोवतालचा परिसरा साफ करण्याचा विसर पडत असल्याचा आरोप तेथील काही भाजीविक्रेते आणि नागरिकांनी केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

परिसरात सुटली दुर्गंधी
गोल बाजार परिसरातील टिळक पुतळ्यासमोर कुजलेल्या, सडलेल्या भाजीपाला आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे बाजारात येणाºया नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून भाजीविक्री व इतर साहित्य खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

पावसाळापूर्व नियोजन फेल
पावसाळ्यापूर्वी शहरातील कचरा, नाले साफसफाई, गाळ उपसा आदी कामे नगर पालिकेकडून करण्यात येते. पण, शहरातील वर्दळीच्या असलेल्या बाजारातील घाणीचा विळखा पाहून पालिकेचे पावसाळापूर्व नियोजन फेल ठरल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

Web Title: Even the statue of Tilak will be suffocating!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस