तीन वर्षांनंतरही वाढीव पाणीपुरवठा योजना अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:24+5:30
कत्राटदाराला ११ एप्रिल २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. प्राकलनानुसार १८६ कि.मी.ची पाईपलाईन व ११ नवीन जलकुंभाचा समावेश असून कामाचा कालावधी २ वर्षांचा निर्धारित केला होता. पण, निर्धारित वेळेत काम होत नसल्याने कंत्राटदाराला प्रतिदिन ७७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. तरीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही.

तीन वर्षांनंतरही वाढीव पाणीपुरवठा योजना अपूर्णच
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजने अंतर्गत मंजूर झालेली ४४ कोटी ४१ लाख रुपयांची योजना निर्धारित कालावधीपेक्षा एक वर्ष जास्त होऊनही पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे यावर्षीही नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नारिकांना पाण्याची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वणा नदी काठावरील या शहरात दररोज प्रतिव्यक्तीला ९० लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील नळ योजना कमी पडत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने विस्तारीत शहराची पाण्याची गरज भागविण्याकरिता अमृत योजनेंतर्गत ४४ कोटीं ४१ लाखाची पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. कत्राटदाराला ११ एप्रिल २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. प्राकलनानुसार १८६ कि.मी.ची पाईपलाईन व ११ नवीन जलकुंभाचा समावेश असून कामाचा कालावधी २ वर्षांचा निर्धारित केला होता. पण, निर्धारित वेळेत काम होत नसल्याने कंत्राटदाराला प्रतिदिन ७७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. तरीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही. आता पुन्हा एक वर्ष लोटूनही शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी मार्केट जवळील जलकुंभ, तहसील कार्यालय समोरील जलकुंभ व रामनगर वार्डातील न्यू म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील जलकुंभाचे काम रखडले आहे. त्यामुळे ही वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करता येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
जीवन प्राधिकरणचे होतेय दुर्लक्ष
या कामाच्या देखरेखेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविली आहे.पण, त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कंत्राटदाराची मनमर्जी सुरु आहे. अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख ठेवण्याऐवजी नागपुरातून कारभार चालवित आहे. या ठिकाणी सुरक्षिततेला बगल दिली जात आहे. ११ डिसेंबर २०१८ ला रामनगर वार्डातील न्यू म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील जलकुंभाच्या कामादरम्यान एक मजूर पडून दगावला. गेल्यावर्षी आंबेडकर चौकात पाईपलाईनकरिता खोदलेल्या ७ फूट खड्यात मोहम्मद हुसैन हसन अली अजानी हा ४ वर्षीय बालक पडला होता पण; वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.
अमृत योजनेअंतर्गत शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे निर्धारित कालावधीत पूर्णत्वास आली नाही. सद्या स्थितीत कोरोनाचा प्रादुभार्वामुळे काम बंद आहे. तरी कंत्राटदाराकडून साहित्याची जुळवाजुळव सुरु असून सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामाची सुरुवात करण्यात येईल. येत्या महिन्यात उर्वरीत कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- दिनेश तपासे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प.हिंगणघाट.