लॉकडाऊनमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:35+5:30
आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार कारंजा (घा.) शेतमाल खरेदीसाठी सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही या भीतीमुळे ते १५ एप्रिलपर्यंत शेतमालाची अत्यंत कमी आवक झाली. या १५ दिवसाचे काळात चना ५४० क्विंटल गहू ४३१ क्विंटल तूर ७१९ क्विंटल आणि सोयाबीन २१४ क्विंटल येवढीच आवक झाली.

लॉकडाऊनमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनतर्फे ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतमाल अद्याप शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे.
लॉकडाऊनमुळे शेतमालाला भाव मिळणार नाही. शेतमालाची वाहतूक , मार्केट पर्यंत कशी करायची छोट्याशा घरात शेतमाल कशा आणि किती दिवस राखून ठेवायचा शेतीचा हंगाम आणि पेरणीचा काळ १ महिन्यावर येऊन ठेपला आहे. सरकारने शेतकऱ्यांची दुरावस्था व संकट लक्षात घेवून १ एप्रिल पासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व उपबाजार, काही अटीच्या आधीन राहून सुरू करण्यात आले आहे. आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार कारंजा (घा.) शेतमाल खरेदीसाठी सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही या भीतीमुळे ते १५ एप्रिलपर्यंत शेतमालाची अत्यंत कमी आवक झाली. या १५ दिवसाचे काळात चना ५४० क्विंटल गहू ४३१ क्विंटल तूर ७१९ क्विंटल आणि सोयाबीन २१४ क्विंटल येवढीच आवक झाली. तुरीचा हमीभाव ५८०० रू प्रतिक्विंटल असताना ५२०० ते ५४०० प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात आला. चनाचा हमीभाव ४६०० प्रति क्विंटल असतांना ३८०० रू प्रति क्विंटल तर सोयाबीनचा हमीभाव ३७१० रूपये असताना ३५०० ते ३५५० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे आणि गहू १६५० ते १८५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी केला. एकंदरीत प्रत्येक शेतमालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने करण्यात आली. सरसकट शासनाचा नियमांची पायमल्ली होत आहे. तरीही कोणत्याही व्यापाऱ्यांवर कारवाई केली नाही. कारंजा कृषी उत्पन्न समिती उपबाजारात, शेतमाल खरेदीसाठी सक्षम असे ७ व्यापारी व १६ अडते आहेत. शेतमालाला कमी भाव मिळत असल्याबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही खरेदी केलेला माल ज्या मील मालकाना विकतो, तो मिलमालक, शेतमालाला हमीभावाएवढी किंमत देत नाही. म्हणून आमचा नाईलाज आहे. तसेच शेतमाल स्वच्छ करणे, वाहनामध्ये माल भरणे व मालकाकडे नेणे याकरीता जादा खर्च लागतो, अशी माहिती जेष्ठ व्यापारी इंद्रकुमार मोटवानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. आम्हीही शेतकरी आहोत. शेतकºयांच्या होत असलेल्या आर्थिक पिळवणूकीबद्दल आम्हालाही वाईट वाटते. पण उपाय नाही.
शासनाने शासकीय खरेदी सुरू करणे हाच यावर उपाय आहे. शेतमाल काढण्याचा आणि विकण्याचा हंगाम जवळ संपत आला आहे. पण शासनाने तुर आणि चण्याची एफसीआयमार्फत शासकीय खरेदी अद्यापही सुरू केली नाही.
कारंजात खरेदी केंद्र बंदच !
कारंजा येथे १७० शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी तर तुर ६४६ शेतकऱ्यांनी तुर विक्रीसाठी खरेदी विक्री संघात, कागदपत्रासह नोंदणी केलेली आहे. पण अद्यापही शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. वर्धा धान्य भांडारापासून वर्धा-कारंजा व आष्टी अंतर ६० कि़मी.पेक्षा जास्त असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर ८ केंद्र मात्र सुरू झालेली आहेत. कापसाची विपनन महासंघाची शासकीय खरेदी करण्यासाठी कारंजा केंद्र सुरू करण्यात आले नाही. ते तातडीने सुरू करावे अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
एफसीआय व सीसीआयची खरेदी सुरू करावी असे पत्र संबंधीताना दिले आहे. बाजार समिती आष्टी व उपबाजार आवार कारंजा येथे शेतकऱ्यांनी मास्क बांधून यावे सोशल डिस्टन्सिंग राखावे अशा सुचना देण्यात आल्या असून हॅन्ड वॉश, पाण्याची व्यवस्था केली आहे. आवारात गर्दी होवू नये म्हणून दररोज एका व्यापाऱ्यांने ६० ते ७० क्विंटल माल खरेदी करावा अशी सुचना करण्यात आली आहे.
- नंदकुमार वरकड, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा