जिल्ह्याचा कोरोना दुपटीचा दर १०.१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:17+5:30
कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर रुग्णांसाठी १७९ खाटा तर ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड बाधितांसाठी १ हजार २९ खाटांची व्यवस्था केली आहे.

जिल्ह्याचा कोरोना दुपटीचा दर १०.१
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड विषाणू सध्या जिल्ह्यात थैमानच घालून पाहत आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याचा कोरोना दुपटीचा दर १०.१, मृत्यू दर १.८ आणि कोविडमुक्तीचा दर ६० टक्केवर असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. परिणामी, वर्धेकरांनी आता आणखी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,००३ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला असला तरी कोरोना दुपटीचा दर १०.१ आहे. इतकेच नव्हे तर मृत्यू दरही १.८ झाला आहे. राज्याच्या मृत्यू दराच्या तुलनेत हा कमी असला तरी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे हृदयाचे ठोके वाढविणाराच आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण ७.५५ टक्के असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.
मंगळवारी आढळले नवे १५१ कोविड बाधित
मंगळवारी ७४९ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी १५१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
एकूण २०९७ खाटांची व्यवस्था
कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर रुग्णांसाठी १७९ खाटा तर ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड बाधितांसाठी १ हजार २९ खाटांची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा कोविड रुग्णालयाला आणखी १०० खाटा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच येथे रुग्ण खाटा वाढेल.
सारीचे २२५ रुग्ण आढळले
जिल्ह्यात कोरोना पाय पसरवित असतानाच आरोग्य विभागाकडून गृहभेटी देऊन विशेष सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात सारीचे एकूण २२५ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत.
१३ हजार ४२८ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला
आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १३ हजार ४२८ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकल्याची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तींना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी बहूतांश व्यक्ती रोगमुक्तही झाले आहेत.
आरोग्य यंत्रणा हायअर्लटवर असली तरी कोरोना मला होणारच नाही असा गैरसमज कुठल्याही नागरिकाने मनात बाळगू नये. सध्याची परिस्थिती बघता प्रत्येक व्यक्तीने स्वत:सह स्वत:च्या कुटुंबीयांची दक्ष राहून काळजी घ्यावी. मी सुरक्षित तर माझे कुटुंबीय सुरक्षित हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. शिवाय जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.
- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.