साथरोग बळावताहेत; प्रतिबंधक उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:39+5:30
हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता अधिक प्रमाणात असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये साथरोगाचे प्रमाण वाढले असून डेंग्यूचेही रुग्ण आढळून आले आहे. तेव्हा या आजाराने आणखी पाय पसरण्यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिवांना दिल्या आहे. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनही कामाला लागले आहे.
जिल्ह्यातील काही भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार असून एडीस डासाच्या मादीपासून याचा प्रसार होतो. हा डास घरात किंवा घराभोवती साठवलेल्या पाण्यात वाढतो.पाणी साठविलेली उघडी भांडी, रांजण, ड्रम, घराभोवती पडलेल्या निरुपयोगी वस्तू, खराब टायर्स, नारळाच्या क रवंट्या, प्लास्टिक बाटल्या, बाटल्यांची टोपणे, चहाचे डिस्पोजेबल कप, डबे, कुंड्या, जुन्या पध्दतीचे कुलर्स इत्यादी ठिकाणी आढळून येतो. हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता अधिक प्रमाणात असते. त्यामुळे डासांचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्याकरिता दक्षता व स्वच्छता हीच उपाययोजना असून सर्व ग्रामपंचायतीसह नागरिकांनीही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्राव्दारे कळविले आहे.
ग्रामीण भागात सर्व उपाययोजना करतांना गावकऱ्यांना यासंदर्भात अवगत करावे व अंमलबजावणी करुन त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहे.
या उपाययोजना राबविण्यास झाली सुरुवात
परिसर स्वच्छ करावा तसेच पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू ठेऊ नये. डेंग्यूचा डास हा दिवसा चावणारा असल्याने दिवसभर अंगभर कपडे घालावे. पाण्याची भांडी झाकून ठेवावी. घरातील टाक्यांना झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. आठवड्यात दर शनिवारला कोरडा दिवस पाळावा.परिसरातील डबकी वाहती करावी किंवा बुजवावी. मोठ्या डबक्यात डास भक्षक गप्पी मासे सोडावेत, साचलेल्या पाण्यात क्रुड आॅईल किंवा रॉकेल टाकावेत. गावातील शेणखताच्या ढिगाºयाचे योग्य व्यवस्थापन करावे, शक्य होत असल्यास गावापासून ५०० मीटर अंतरावर हलवावे व प्रत्येक गावामध्ये डासांची घनता कमी करण्यासाठी नियमीत धुरळणी करावी.