ढगा भुवनाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कायमच
By Admin | Updated: February 11, 2015 01:48 IST2015-02-11T01:48:44+5:302015-02-11T01:48:44+5:30
महाशिवरात्री यात्रा अवघ्या पाच दिवसावर आली. वनविभाग व तालुका प्रशासन मात्र अजुनही झोपेचे सोंग घेवून आहे.

ढगा भुवनाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कायमच
आकोली : महाशिवरात्री यात्रा अवघ्या पाच दिवसावर आली. वनविभाग व तालुका प्रशासन मात्र अजुनही झोपेचे सोंग घेवून आहे. नदीवरील पुलाचा अर्धा भाग नादुरूस्त आहे. रस्ता ओबडधोबड आहे. यात्रास्थळी आतापर्यंत साफसफाईची कामे सुरू होणे अपेक्षित होते. असे असताना कोणत्याही विभागाचा संबंधित अधिकारी या स्थळाकडे फिरकला नाही.
सातपुडा पर्वतरांगेत वसलेले ढगा हे तीर्थस्थळ भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे द्विशिवलींग दर्शनाकरिता भाविक येथे नेहमीच भक्तीभावाने नतमस्तक होण्याकरिता येतात. महाशिवरात्रीला तर येथे भक्तांचा सागर लोटतो. येथे ४१ दिवशी शिवकथा व भागवत सप्ताह सुरू आहे. दर सोमवारी भाविकांची रिघ लागत असली तरी सुविधांचा मात्र येथे सुकाळ आहे.
ढगा भुवनात जाण्याच्या रस्त्यावरील पूल अत्यंत धोकादायक झाला. येथे मोठा अपघात घडू शकतो. ही बाब सामान्य माणसाला समजते; पण प्रशासनाला उमगलेली दिसत नाही. अवघे पाच दिवस यात्रेला शिल्लक राहिले असतांनी पूल दुरूस्तीला सुरुवात केली नाही. ओबडधोबड, दगड धोंड्यातून भाविकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. वर्षभरापासून रस्ता कामाचे साहित्य पडून व टेंडर झाले असताना रस्त्याचे काम झाले नाही. यावरून प्रशासन किती असंवेदनशील आहे, हे दिसून येते.
यात्रास्थळावरील जागेची साफसफाई करण्याची तसदी सुद्धा वनविभागाने घेतली नाही. वनविभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमधील असमन्वयामुळे नियोजनाचे वाभाडे निघाले आहे. वनविभाग व तालुका प्रशासनाने दखल घेत यात्रास्थळी किमान मुलभूत साईसुविधा पुरविणे प्रशासनाची जबाबदारी आहे.(वार्ताहर)