शासनाच्या निषेधार्थ कापसाची होळी
By Admin | Updated: December 6, 2014 22:52 IST2014-12-06T22:52:57+5:302014-12-06T22:52:57+5:30
नवीन केंद्र शासनानेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला़ जुनेच धोरण राबवून अल्प हमीभाव जाहीर केला़ राष्ट्रीय किसान जागृती अभियानने केंद्र सरकारच्या या कापूस धोरणाचा गावोगावी कापूस

शासनाच्या निषेधार्थ कापसाची होळी
वर्धा : नवीन केंद्र शासनानेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला़ जुनेच धोरण राबवून अल्प हमीभाव जाहीर केला़ राष्ट्रीय किसान जागृती अभियानने केंद्र सरकारच्या या कापूस धोरणाचा गावोगावी कापूस जाळून निषेध केला़ या आंदोलनात शेतकऱ्यांनीही सहभाग घेत शासनाचा निषेध नोंदविला़ वर्धेत मगनवाडी येथील खरेदी भवनासमोर कापसाची होळी करण्यात आली़ यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले़
मागील सरकारच्या काळात देशातील व प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादकांचे हाल झाले होते़ परिणामी, देशात व प्रामुख्याने विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या़ या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा समोर करून सत्तेत आलेल्या नवीन सरकारनेही आता जुन्याच सरकारच्या धोरणाचा अवलंब केल्याने पुन्हा एकदा देशातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे़ यंदा पाऊस उशिरा आल्याने पेरणीसही विलंब झाला़ यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन घटले़ अशा स्थितीत कापसाला असलेल्या अल्प भावामुळे एकरी खर्चही भरून निघणे कठिण झाले आहे़ नवीन शासनानेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसल्याची जाणीव सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाली आहे़ नवीन शासन जुन्याच सरकारच्या वाटेवर असल्याने शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी कापूस धोरणाचा विरोध करण्यासाठी कापसाची गावोगावी होळी केली़
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला जाळलेला कापूस भेट देण्यात येणार आहे़ शिवाय दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही जाळलेला कापूस देणार असल्याची माहिती अभियानाचे प्रवक्ते अभिमन्यू भारतीय यांनी दिली़ निवेदन सादर करताना रवी मानव, सुमंत दास, यशवंत ढगे, डॉ़ राम बोकडे, जगदीश मर्दराज, बाबूलाल कोरी आदी शेतकरी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)