कापूस व सोयाबीन उत्पादकांचे धरणे

By Admin | Updated: December 6, 2014 00:23 IST2014-12-06T00:23:19+5:302014-12-06T00:23:19+5:30

अखिल भारतीय किसान सभा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यात आले़ ...

Catch cotton and soybean growers | कापूस व सोयाबीन उत्पादकांचे धरणे

कापूस व सोयाबीन उत्पादकांचे धरणे

वर्धा : अखिल भारतीय किसान सभा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यात आले़ यात जिल्ह्यातील वर्धा, देवळी, सेलू, आर्वी, आष्टी हिंगणघाट, कारंजा (घा़) तालुक्यातून २५० हून अधिक शेतकरी पुरूष व महिला सहभागी झाल्या होत्या़
धरणे आंदोलन प्रसंगी घेण्यात आलेल्या सभेत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जानराव नागमोते, गणपत मेंढे, चंद्रभान नाखले, प्रल्हाद ढेंगरे, सिटूचे महेश दुबे, सीताराम लोहकरे, जनवादी महिला संघटनेच्या प्रभा घंगारे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले़ याप्रंसगी यशवंत झाडे म्हणाले, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे़ उशिरा आलेल्या व लवकर निघून गेलेल्या पावसाने उत्पादन निम्म्याच्याही कमी झाले आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल व सोयाबीन ३५०० प्रति क्विंटलच्या आसपास आहे़ कापूस व सोयाबीन विकून शेतीला लावलेला खर्चही वसूल होत नसल्याचे वस्तूस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी वर्षभर कुटुंब कसे चालविणार हा प्रश्न आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यांत शासनाने दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करावी़ तसेच स्वामीनाथन कमिशनच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च व ५० टक्के नफा जोडून सर्व शेतमालाचे उत्पादन दर केंद्र सरकारने जाहीर करावे, शेतमालाची खरेदीची व्यवस्था करावी़, कापसाला ७ हजार रूपये व सोयाबीनला ४५०० रूपये प्रति क्विंटल दर मिळावा, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच त्या लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मागील दहा वर्षात शेतीला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, बियाणे, रासायनिक खते, फवारणी औषधे, मजुरी, जनावरांचा चारा, प्रवास खर्च, वीजबिल पाच ते दहा पटीने वाढले़ मात्र उत्पादित शेतमालाचे दर पडत आहे़ अशा स्थितीत वाढत्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे शेतमालाचे हमी दर मिळणे अपेक्षित आहे़ मात्र कोणतेही सरकार याकडे लक्ष देत नाही़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या तेव्हावी आणि आताही सुरूच आहे. शेतीसाहित्याच्या किमती वाढतच आहे आणि तुलनेत शेतमालाच्या किमती मात्र घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी सुनील गाढे यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने सादर करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आमदार, खासदार यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या़
यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष अनिल चव्हाण, पांडुरंग राऊत, गणपत मेंढे, शामराव कालोकर, वासुदेव पाल, जगन चांभारे, चंद्रभान नाखले यांच्यासह जिह्यातील महिला व पुरूष शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Catch cotton and soybean growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.