शौचालयाच्या कामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:18+5:30
कोरोना संकटात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शौचालय निर्मितीच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीने शौचालयाचे काम पूर्ण केले त्या लाभार्थ्यांच्या झालेल्या कामाचे छायाचित्रही अपलोड करण्याचे काम सध्या थांबले आहे. त्यामुळे अनेक गरजुंना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणीत येत आहेत.

शौचालयाच्या कामांना ब्रेक
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हागणदारीमुक्त वर्धा या हेतूने जिल्ह्यातील गावागावात शौचालय बांधकामाचा विषय जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)च्यावतीने हाती घेण्यात आला. परंतु, कोरोना संकटात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शौचालय निर्मितीच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीने शौचालयाचे काम पूर्ण केले त्या लाभार्थ्यांच्या झालेल्या कामाचे छायाचित्रही अपलोड करण्याचे काम सध्या थांबले आहे. त्यामुळे अनेक गरजुंना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणीत येत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१२ पूर्वी १ लाख ९२ हजार ८०४ कुटुंब होते. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात या कुटुंबापैकी १ लाख १ हजार २५७ कुटुंबांकडे शौचालय असल्याचे पुढे आले. त्यानंतर हागणदारीमुक्त वर्धा या हेतूने उर्वरित प्रत्येक घरी शौचालय बांधणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देत शौचालय निर्मितीवर भर देण्यात आला. ३१ जानेवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यात एकूण ९१ हजार ५४७ शौचालय बांधण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील याच कामाची दखल घेत केंद्र व राज्य शासनाकडून वर्धा जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवाय त्यानंतर झालेल्या दोन सर्वेक्षणात एकूण २० हजार ९३२ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे पुढे आले. परिणामी हेच उद्दीष्ट वर्धा जिल्ह्याला मिळाले. शासनाकडून २० हजार ९३२ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट मिळाल्यानंतर जि.प.च्या स्वच्छता मिशन (ग्रामीण)कडून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. शिवाय त्यापैकी १२ हजार ३९२ शौचालय बांधण्यात आले. परंतु, कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच लॉकडाऊनमुळे सध्या ८ हजार ५४० शौचालय बांधकामाला ब्रेक लागला आहे.
१२ हजारांचे मिळतेय प्रोत्साहनपर बक्षीस
हागणदारीमुक्त गाव या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन घराच्या आवारात शौचालय बांधणाºया व्यक्तींना शासनाकडून प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १२ हजार रुपये दिले जाते. असे असले तरी अनेकांनी शौचालयाचे काम पूर्ण करूनही त्यांच्या कामाचे छायाचित्रत अपलोड न झाल्याने ते या शासकीय योजनेपासून सध्या वंचित आहेत.
गुंडे, गुल्हाणेंच्या काळात उत्कृष्ट काम
वर्धा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून सध्या डॉ. सचिन ओम्बासे कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्यापूर्वी वर्धा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नयना गुंडे आणि अजय गुल्हाणे यांनी सेवा दिली आहे. याच दोन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य झाल्याने शासनानेही त्याची दखल घेत वर्धा जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरविले होते.