नगरपालिकेच्या सेवांचा ऑनलाईन घेता येणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:13+5:30
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने एका प्रकल्पांतर्गत नगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या मालमत्ता करसंबंधी १२ सेवा, पाणीपुरवठा संबंधी १४ सेवा, ना हरकत प्रमाणपत्रासंबंधी २ सेवा आणि व्यापार परवान्यासंबंधी १० सेवा सद्यस्थितीत ‘आपले सरकार महाऑनलाईन’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील नागरिकांना पालिकेकडून विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किंवा कराचा भरणा करण्यासाठी पालिकेत जावे लागते. त्यामुळे नगरपालिकेत गर्दी होऊन अनेकांचा वेळ वाया जातो. नागरिकांच्या वेळेच्या बचतीसह तत्काळ सेवा मिळण्याकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे कामात गती आणि पारदर्शकताही निर्माण होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने एका प्रकल्पांतर्गत नगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या मालमत्ता करसंबंधी १२ सेवा, पाणीपुरवठा संबंधी १४ सेवा, ना हरकत प्रमाणपत्रासंबंधी २ सेवा आणि व्यापार परवान्यासंबंधी १० सेवा सद्यस्थितीत ‘आपले सरकार महाऑनलाईन’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामुळे नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन घरबसल्या किंवा जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासह कर भरणा करण्याचीही सुविधा असल्याने आता नगरपालिकेत येऊन चकरा मारण्याची गरज भासणार नाही. परिणामी, पालिका कार्यालयात नागरिकांची गर्दीही वाढणार नाही. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर ठराविक मुदतीत प्रमाणपत्र देणे हे पालिकेला बंधनकारक राहणार आहे.
त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचीही आता जबाबदारी वाढली आहे. या सुविधांचा वर्धेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी केले आहे. तसेच यामध्ये काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास नागरिकांना लगेच माहिती देण्यासही सांगितले आहे.
नागरिकांना विविध कागदपत्रे मिळणे सुलभ
नगरपालिकेत विविध प्रकारची कागदपत्रे, नाहरकत प्रमाणपत्र मिळविताना मोठी अडचण होत होती. यात नागरिकांच्या वेळ आणि पैशाचाही अपव्यय होत होता. एकाच कामाकरिता सातत्याने येरझारा कराव्या लगत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. एवढे करूनही अनेकांची वेळीच कामे होत नव्हती. नगराध्यक्षांनी ही बाब लक्षात घेऊन ऑनलाईन सुविधा उपलब्ध केल्याने नागरिकांचा आता त्रास बंद होणार असून कागदपत्रे मिळणे सुलभ होणार आहे. पालिकेच्या कामालाही गती मिळणार आहे.