‘लोकरंग’मधून घडले महाराष्ट्रातील कलांचे दर्शन
By Admin | Updated: January 4, 2015 23:19 IST2015-01-04T23:19:03+5:302015-01-04T23:19:03+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गीत आणि नाटक विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र पुणेच्या कलाकारांनी महाराष्ट्राचा लोकरंग कार्यक्रम सादर केला.

‘लोकरंग’मधून घडले महाराष्ट्रातील कलांचे दर्शन
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गीत आणि नाटक विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र पुणेच्या कलाकारांनी महाराष्ट्राचा लोकरंग कार्यक्रम सादर केला. यावेळी कलाकारांनी महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे सादरीकरण केले.
कलाकारांनी गण, गौळण, भारूड, गोंधळ, अभंग, वाघ्या-मुरळी, वासुदेव इत्यादी लोककलांचे दर्शन आपल्या अभिनय आणि नृत्यांच्या माध्यमातून घडविले. गीत आणि नाटक विभागाचे उप-निदेशक धृव अवस्थी आणि व्यवस्थापक किरण कुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनात २० हून अधिक कलाकारांचा जत्था विद्यापीठात दाखल झाला होता. पथक प्रमुख संध्या लोंढे व पंकज दाभाडे यांच्या नेतृत्वात हे कलाकार आपल्या कला सादर करतात.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती गजवदना गौरीच्या नंदना या गिताने झाली. यानंतर खंडेरायाच्या लग्नाला, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वाजले की बारा अशा एकाकून एक गीत आणि नृत्यांची बहारदार पेशकश करीत कलाकारांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दिलफेक संवाद आणि हास्यविनोद यावेळी पहावयास मिळाले. एकाहून एक सरस अशा लावण्या सादर करून उपस्थितांना ठेका धरण्यास बाध्य केले. आपल्या कलेतून त्यांनी स्वच्छ भारत अभियान, घरकूल योजना, प्रौढ शिक्षण, दारूबंदी आणि व्यसनमुक्तीचा संदेशही दिला. हे कलाकार परभणी, नांदडे, सातारा, मिरज येथून आले होते.
कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र आणि प्रकुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र यांनी कलाकारांचे स्वागत करून त्यांना प्रमाणपत्र दिले. संचालन नाट्यकला व फिल्म अध्ययन विभागाचे प्रा. सुरेश शर्मा यांनी केले. डॉ. सतीश पावडे आणि जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.(स्थानिक प्रतिनिधी)