स्वच्छतागृह उभारण्यात उदासीनता
By Admin | Updated: May 1, 2015 01:42 IST2015-05-01T01:42:57+5:302015-05-01T01:42:57+5:30
गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

स्वच्छतागृह उभारण्यात उदासीनता
वर्धा : गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र पालिका प्रशासनाकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसते. शहरात स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. याबाबत स्थानिक नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
शहरातील प्रमुख चौक व गर्दीच्या स्थळी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबना होते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे आणि ती स्वच्छ ठेवावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिका प्रशासनाला दिला होता. याकरिता ३१ मार्च पर्यंत मुदत आखुन दिली होती. मात्र याबाबतची अंतिम योजना अद्याप पूर्ण न झाल्याचीही माहिती मिळाल्याने तसेच चार पालिकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने नमूद करून न्यायालयाने सर्व पालिकांना १५ जुन पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच ही अंतिम संधी असल्याचे न्यायालयाने खडसावले.
वर्धा पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाजपा नगरसेवकांकडून निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. नगरपालिकेत भाजपाचे शासन असताना शहराच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाकडे व न.प. चे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून आखलेल्या योजनांकडे सत्ताधारी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी निवेदनातून करण्यात आला. या विविध मागण्याचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत यांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेल्या चर्चेत काही सूचना सांगितल्या. दूर्गा टॉकीजच्या परिसरात नाल्यावर स्लॅब टाकून स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात यावी, यासह आर्वी नाका चौकात स्वच्छतागृह बांधावे. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, गटनेते कमल कुलधारिया, प्रदीप ठाकरे, मंगेश मांगलेकर, सतीश मिसाळ, वीरू पांडे यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)