वर्ध्यात साकारला ‘आदर्श’ भाजी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:50+5:30
शहरातील मुख्य भाजीबाजारात मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग करीता वर्ध्यातील भाजीबाजार १८ ठिकाणी हलविण्यात आला आहे. यादरम्यान महादेवपुरा परिसरात भाजीबाजार सुरु करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नव्हते.

वर्ध्यात साकारला ‘आदर्श’ भाजी बाजार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संचारबंदीच्या काळातही भाजीबाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरीही भाजीबाजारात सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लबच्या सहकार्याने वर्ध्यातील केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजीबाजार साकारण्यात आला आहे. हा भाजीबाजार शुक्रवारपासून ग्राहकांकरिता उपलब्ध होणार आहे.
शहरातील मुख्य भाजीबाजारात मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग करीता वर्ध्यातील भाजीबाजार १८ ठिकाणी हलविण्यात आला आहे. यादरम्यान महादेवपुरा परिसरात भाजीबाजार सुरु करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नव्हते. त्यामुळे येथील बाजार आता शुक्रवारपासून केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरील आदर्श भाजी बाजारत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या करिता वर्ध्यातील रोटरी क्बलचे मोठे सहकार्य मिळाले असून महेश मोकलकर, आसिफ जाहिद, अध्यक्ष पंकज शर्मा, अमित गांधी, नितीन शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी गेल्या आठ दिवसांपासून मेहनत घेत आहे. त्यांनी बाजाराची व्यवस्था करुन दिली असून आज विभागीय आयुक्त डॉ. सजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व तहसीलदा प्रीती डुडुलकर यांनी या भागाची पाहणी केली. तसेच आयुक्तांनी याकरिता हिरवी झेंडी दाखविली असून शुक्रवार २४ एप्रिलपासून हा आदर्श भाजीबाजार वर्धेकरांसाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत खुला राहणार आहे.
भाजीबाजारातील गर्दी टाळण्याकरिता केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजी बाजाराची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता रोटरी क्लबचे सहकार्य मिळाले आहे. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व उपाययोजना येथे केल्या असून या सारखेच आणखी तीन ठिकाणी भाजीबाजार तयार केले जाईल.
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.
असे आहे या बाजाराचे वैशिष्ट
या ठिकाणी तब्बल ४२ दुकांनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवण्यात आले असून येथे सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकारपणे पालन व्हावे म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. दुकानापासून काही अंतराव हिरवी नेट टाकली असून त्या ठिकाणी सामाजिक अंंतर ठेऊन ग्राहकांना बसण्याकरिता चार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर बाहेरही रकाने तयार करुन ग्राहकांना तेथे उभे ठेवण्यात येणार आहे.
दुकानदारांसाठी सकाळी ७ ते दुपारी १ वाजताचा वेळ देण्यात आला आहे. महादेवपुऱ्यातील भाजीपाल्याची सर्व दुकाने या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. इंदिरा चौकाकडून असलेल्या केसरीमल शाळेच्या मोठ्या गेटमधून भाजीपाल्याची वाहने आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ९ वाजातपर्यंत दुकाने लावायची असून ९ वाजतापासून विक्री सुरु होईल.
या मैदानाला समोर दोन गेट असून या दोन्ही गेटमधून ग्राहकांना येता येणार आहे. झिकझॅक गेट तयार करण्यात आले असून तेथेच हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दुकानदारांना सुरक्षा किट देण्यात आली आहे. तेथील स्टेजवरुन सर्वांना वेळोवळी सूचना दिल्या जाणार आहे. या ठिकाणी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तसेच रोटरीचे स्वयंसेवक पूर्णवेळ उपस्थित राहतील.