३० हजार लिटर स्वच्छ पाणी गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:26 IST2019-05-07T23:26:10+5:302019-05-07T23:26:45+5:30
पवनार येथून वर्धेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी परिसरात फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी कमीत कमी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

३० हजार लिटर स्वच्छ पाणी गेले वाहून
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पवनार येथून वर्धेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी परिसरात फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी कमीत कमी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पवनारच्या धाम नदी पात्रातून पाण्याची उचल करून येथीलच शुद्धीकरणात पाणी स्वच्छ करण्यात येते. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्याचा वर्धा शहराला पुरवठा केल्या जातो. वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासनाच्यावतीने सहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यातच शहरातील अनेक विहिरी आणि बोअरवेल कोरड्या झाल्याने नागरिकांही घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
अशातच ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने व जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार असून नागरिकांच्या अडचणीत भरच पडणार आहे. या घटनेचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. अचानक फुटलेल्या जलवाहिनीच्या घटनेमुळे न.प. प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.
आणखी जलवाहिनी फुटण्याची शक्यता
पवनार ते दत्तपूर टि-पॉर्इंटपर्यंतची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असली तरी पुढील जलवाहिनी ही सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. तापमानातील बदलामुळे ही जलवाहिनी फुटली असावी असा अंदाज न.प.च्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात असून वेळीच नवीन जलवाहिनी न टाकल्यास कुजलेली ही जुनी जलवाहिनी आणखी कुठून ना कुठुन फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फुटलेली जलवाहिनी ५० वर्षे जुनी
वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाºया पवनार ते दत्तपूर टि-पॉर्इंटपर्यंतची मुख्य जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या सहकार्याने नवीन टाकण्यात आली आहे. परंतु, त्यानंतर वर्धेच्या दिशेने येणारी मुख्य जलवाहिनी ही सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. अशातच ही जुनी जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयाजवळ फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेल्याचे सांगण्यात आले.
अन्यथा वाहून गेले असते १ लाख लिटर पाणी
ज्या वेळी ही जलवाहिनी फुटली त्यावेळी या जलवाहिनीच्या माध्यमातून पूर्ण दाबाने वर्धेच्या दिशेने पाणी येत नव्हते. जे पाणी वाहून गेले ते या जलवाहिनीत पूर्वीच होते. जर पूर्ण दाबाने वर्धेच्या दिशेने पाणी येत असताना ही जलवाहिनी फुटली असती तर कमीत कमी १ लाख लिटर पाणी वाहून गेले असते असे सांगण्यात आले.
बांधकाम विभागाने मागितले प्राकलन
दत्तपूर टि-पॉर्इंट ते आरती चौक पर्यंतची नवीन जलवाहिनी टाकण्याचे वर्धा न.प. प्रशासनाच्या विचाराधीन आहे; पण निधी अभावी हे काम सध्या थंडबस्त्यात आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने दत्तपूर टि-पॉर्इंट ते आरती चौक पर्यंत जलवाहिनी टाकण्या संदर्भातील प्राकलन (इस्टीमेट) मागीतले. त्यानंतर पालिका प्रशासनानेही सदर प्राकलन बांधकाम विभागाला दिले. मात्र, सध्या घोड अडले कुठे हे न उलगडणारे कोड ठरत आहे.