२१ जलाशये फुल्ल...
By Admin | Updated: September 28, 2015 02:22 IST2015-09-28T02:22:52+5:302015-09-28T02:22:52+5:30
जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतीला याचा तितकासा फायदा झाला नसला तरी जिल्ह्यातील जलाशयाची पातळी वाढविण्यासाठी तो पुरक ठरला.

२१ जलाशये फुल्ल...
११ ओव्हरफ्लो : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
वर्धा : जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतीला याचा तितकासा फायदा झाला नसला तरी जिल्ह्यातील जलाशयाची पातळी वाढविण्यासाठी तो पुरक ठरला. जिल्ह्यातील मध्यम व मोठे दहा तर लघु अकरा अशी एकूण २१ जलाशये शंभर टक्के भरली आहेत तर ११ जलाशये ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे यंदाच्या दमदार पावसाने जलाशयाची पातळी वाढून उन्हाळ्यातील जलसंकट टळल्याचे बोलल्या जात आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण १५ मोठे व मध्यम जलायश आहेत. त्यामध्ये सर्व मिळून १५७४.४८० दलघमी. जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत १२१४.८९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी २३ सप्टेंबरपर्यंत १२५३.५२ दलघमी जलसाठा होता. जिल्ह्यात एकूण २० लघू प्रकल्प असून त्यांची साठवणूक क्षमता ३३.२९६ दलघमी इतकी आहे. यामध्ये सध्या २९.२३ दलघमी इतका जलसाठा उपलब्ध आहे. १५ मोठ्या व मध्य जलाशयापैकी धाम प्रकल्प, पोथरा जलाशय, पंचधारा प्रकल्प, डोगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, नांद प्रकल्प, उर्ध्व वर्धा प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघू प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहे. पंचधारा व नांद प्रकल्प वगळता उर्वरित नऊ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर लहादेवी, अंबाझरी, पांझरा बोथली, उमरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा-२, आष्टी, कन्नमवारग्राम, मलकापूर, हराशी हे अकरा लघु प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यातील हराशी या एकाच लघु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सहा लघु जलाशय हे ७५ टक्के भरलेले आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश जलाशय फुल्ल झाल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मिटणार असल्याचे दिसून येत आहे.(शहर प्रतिनिधी)
निम्न वर्धाचा जलसाठा सर्वात कमी
जिल्ह्यातील पंधरा मोठे व मध्यम प्रकल्पामध्ये आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचाही समावेश आहे. या १५ जलाशयापैकी दहा जलाशय शंभर टक्के तर तीन जलाशय ८० टक्क्याच्या वर भरलेले असताना निम्न वर्धा प्रकल्पात आतापर्यंत केवळ १७.५८ टक्केच जलसाठा असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या जलाशयाची क्षमता २५३.२४० दलघमी असून आतापर्यंत ३८.१३० दलघमी जलसाठा उपयुक्त आहे.