१५०० शेतकरी तणावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:45+5:30
प्रेरणा प्रकल्पांतर्गत एक हजार ३५ आशा वर्कर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे.

१५०० शेतकरी तणावात
चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला गेला आहे. अनेक शेतकरी कुटुंबीय पतसंस्था तसेच खासगी सावकारांचे कर्जबाजारी झाले आहेत. सततच्या दुष्काळामुळे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख तणावात जीवन जगत आहेत. अशा कुटुंबीयांचे प्रेरणा प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १ हजार ५१० कुटुंबप्रमुख तणावपूर्ण आयुष्य जगत असल्याची माहिती समोर आली. यातील ४८९ सौम्य, ४०३ मध्यम तर ६१४ शेतकरी तीव्र तणावग्रस्त आहेत.
प्रेरणा प्रकल्पांतर्गत एक हजार ३५ आशा वर्कर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे. यापैकी १६५ कुटुंबप्रमुख तणावात आयुष्य जगत आहेत. ३४ सौम्य आणि १३१ तीव्र स्वरूपातील तणावात आहेत. सेलू तालुक्यातील २९ हजार ५३७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २४६ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले. समुद्रपूर तालुक्यातील २९ हजार ३९९ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ४३ शेतकरी, कारंजा तालुक्यातील १८ हजार ९४८ पैकी ५४८ शेतकरी, देवळी तालुक्यातील २६ हजार ६०८ पैकी ३३५ शेतकरी, आर्वी तालुक्यातील २५ हजार ९७३ पैकी १२४, आष्टी तालुक्यातील १२ हजार ४२५ पैकी ३४ आणि हिंगणघाट तालुक्यातील २७ हजार २२३ कुटुंबापैकी १५ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले आहे. तणावाचे रुपांतर आत्महत्यांमध्ये होऊ नये, यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येत आहे.
हमीभाव ठरू शकतो औषधोपचार
तणावग्रस्त शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास कुटुंब तणावमुक्त होऊ शकतो. उत्पादन खर्चात नांगरणी, वखरणी, वेचणी, पेरणी, खत, बियाणे पेरणी खर्च, तणनाशक, फवारणी आदींसह बाजारपेठेत आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च मोठ्याप्रमाणावर होत आहे. परंतु, बाजारात त्याच्या मालाला कमी भाव आहे. त्यामुळे शेतीव्यवसाय तोट्यात आहे. राब-राब राबूनदेखील कष्टाचे फळ मिळत नसल्याने शेतकरी तणावाखाली वावरतात. शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार त्यांना नाही. अशा विविध कारणांमुळे शेतकºयांचे खच्चीकरण होते, परिणामी तो तणावाखाली येतो.