वसईतून एसटी होणार बंद

By Admin | Updated: September 17, 2016 01:52 IST2016-09-17T01:52:08+5:302016-09-17T01:52:08+5:30

एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Will stop Vasai ST? | वसईतून एसटी होणार बंद

वसईतून एसटी होणार बंद

शशी करपे , वसई
एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातून आता लाल डबा गायब होण्याच्या मार्गावर आहे.
वसई तालुक्यातील अर्नाळा, वसई आणि नालासोपारा एस.टी.आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगोला, लातूर, पुणे, अंमळनेर, संगमनेर, कराड इचलकंरजी आदी लांब पल्ल्याच्या गाड्या १ जुलैपासून बंद केल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धावत असलेल्या या गाड्या दररोज पन्नास हजारांहून अधिक रुपयांचा गल्ला जयवंत होत्या. थेट प्रवाशांपेक्षा आपल्या गंतव्य स्थानापासून हायवे, चिंचोटी , कामणफाटा, ससुनवघर, घोडबंदर, ठाणे, पनवेल,स्वारगेट अशा छोट्या-छोट्या पल्ल्यातील प्रवाशी घेवून हजारोंचा गल्ला जमवत होत्या. लांब पल्ल्यांतील प्रवाशी कमी असल्यामुळे कागदावर त्यांची संख्या कमी दिसत असली तरी छोट्या पल्ल्यांच्या प्रवाशांमुळे एस.टी.ला जास्त कमाई होत होती. त्यानंतरही या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. टप्पा वाहतुकीपेक्षा थेट प्रवासी असतील तर त्या सुरु ठेवण्यात याव्यात.असे एस.टी.ला परिवहन मंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता सांगोला, अंमळनेर, संगमनेर, लातूर, पुणे या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर विभागातून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी यांनी केला आहे. त्यातच नालासोपारा आगारातील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय एस.टी.महामडळाने घेतला आहे.

वसई आगारातून ९ मार्गावर शहर वाहतूक सुरु असून त्यातील गिरीज, रानगाव भुईगाव या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरीत मार्गावरील वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहेत. नालासोपारा एसटी आगारातून सध्या एकूण १६ मार्गांवर शहर बस वाहतूक होत आहे. या सर्व बसेस पश्चिम पट्ट्यात धावणाऱ्या आहेत. आता यातील पाच मार्गावरील बस वाहतूक बंद केली जाणार आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी एस.टी.चा गाशा लवकरच गुंडाळण्यात येण्यार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बस बंद होत असल्यामुळे एस.टी.कामगार धास्तावले असून,तसे झाल्यास पोटाची खळगी भरण्यासाठी या कामगारांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागणार आहे. त्यामुळे एस.ट्या.वाचवण्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याची चर्चा सोशल मीडियावरून केली जात आहे.

Web Title: Will stop Vasai ST?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.