ती माणसे रांगेत आहेतच कुठे? त्यांची बँक खाती नाहीत का?
By Admin | Updated: November 17, 2016 07:28 IST2016-11-17T07:28:19+5:302016-11-17T07:28:19+5:30
ज्यांचा काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हा खटाटोप केला आहे, अशी माणसे मात्र रांगेत दिसत नसल्याने त्यांची बँकेत खाती नाहीत का, अशी चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.

ती माणसे रांगेत आहेतच कुठे? त्यांची बँक खाती नाहीत का?
भातसानगर : पाचशे हजार रु पयांच्या नोटा बदलण्यासाठी शहापुरात गेल्या अनेक दिवसांपासून तासन्तास सर्वसामान्य माणसे उभी असल्याचे दिसत आहे. मात्र, ज्यांचा काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हा खटाटोप केला आहे, अशी माणसे मात्र रांगेत दिसत नसल्याने त्यांची बँकेत खाती नाहीत का, अशी चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.
हजार, पाचशे रु पयांच्या नोटा रद्द करण्याच्या धोरणानंतर त्या बदलण्यासाठी शहापूर तालुक्यातील सर्वच बँकांमध्ये सकाळी साडेसहापासूनच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता या रांगेत तासन्तास उभी राहत असल्याचे दिसत असून या रांगेत मात्र मोठे राजकीय पदाधिकारी, धनदांडगे, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी दिसत नाही. त्यामुळे यांची बँक खाती नाहीत का? की, त्यांच्या नावावर पैसेच नाहीत. मग, आहेत तर ती कुठे आहेत, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. काहींचे नातेवाईकच बँकांमध्ये नोकरीला असल्याने अनेकांनी रांगेत उभे न राहता आपापले पैसे बदलून, तर काही काळ्याचे गोरे करून घेतल्याची चर्चा आहे. मग, पैसे बदलण्यासाठी बँकेत कितीही पैसे भरायचे असतील वा काढायचे असतील, तर तीच व्यक्ती असल्याशियाय बँकेत पैसे दिले जात नाहीत. असे असतानाही मग ही माणसे रांगेत नसतानाही त्यांचे पैसे बदलून कसे दिले जातात, असा प्रश्न निर्माण होत आहे. हा त्रास केवळ सर्वसामान्यांनाच होत असल्याने बँक कर्मचारी व रक्कम स्वीकारण्यास येणाऱ्यांत वाद होत आहेत. (वार्ताहर)