पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरही वाढला
By Admin | Updated: February 16, 2016 02:42 IST2016-02-16T02:42:00+5:302016-02-16T02:42:00+5:30
वडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ

पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरही वाढला
उल्हासनगर : निवडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ करणारा उल्हासनगरचा अर्थसंकल्प सोमवारी स्थायी समितीला सादर झाला. उत्पन्नवाढीच्या नव्या साधनांचा विचार न झाल्याने आणि निवडणुकीच्या तोंडावर एकही मोठा प्रकल्प हाती न घेतल्याने सत्ताधाऱ्यांतही अर्थसंकल्पाबद्दल नाराजी असून विरोधकांनीही त्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, ही दरवाढ केली नाही, तर शहराचा विकास अशक्य असल्याचे परखड मत आयुक्तांनी नोंदवले आहे.
महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी हा ६०७.३० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती जया माखिजा यांना सादर केला.
पाणीपट्टीवाढीतून ५१ कोटी, तर मालमत्ता करवाढीतून १६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. याखेरीज, पालिका शाळांसाठी ४२ कोटी, चालिया मंदिर तीर्थस्थळाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद आहे. रस्त्याच्या सिमेंट क्राँकिटीकरणासाठी ५३.३४ कोटींची तरतूद आहे. पालिकेच्या पाणीपट्टी आणि मालमत्ता करात वर्षानुवर्षे वाढ झालेली नाही. शहर विकास, उत्पन्न-खर्चातील तफावत दूर करण्यासाठी नाइलाजास्तव ७० कोटींची करवाढ करावी लागल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)भुयारी गटार योजना, खेमानी नाला व वालधुनी नदीचा विकास, वाढीव पाणीपुरवठा योजना, पालिका शाळा अद्ययावत करून पुनर्बांधणी करणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांनी शहर विकासासाठी इतर उत्पन्नाच्या मार्गासह दरवाढ ‘जैसे थे’ ठेवली तर शहर विकास शक्य असल्याचे परखड मत त्यांनी नोंदवले.