वाहतूककोंडी वाढून पाणीटंचाई तीव्र होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:42 AM2019-09-17T05:42:29+5:302019-09-17T05:42:35+5:30

नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत.

Water scarcity will intensify as traffic congestion increases | वाहतूककोंडी वाढून पाणीटंचाई तीव्र होणार

वाहतूककोंडी वाढून पाणीटंचाई तीव्र होणार

Next

- नारायण जाधव 
ठाणे : रायगड आणि ठाणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या पाच (इंटिग्रेटेड टाउनशिप) अर्थात खासगी एकात्मिक नगरवसाहतींमुळे आधीच नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत. सध्या या पाच वसाहतींच्या पार्श्वभूमीवर विकासक आणि सरकार प्रदेशातील जागांचे भाव वाढणार असल्याचे सांगत असले तरीसर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसणार असून एमएमआरडीएचे नियोजन कागदावरच आहे.
पनवेल, पेण-अलिबागसह भिवंडी आणि कल्याण-डोंबिवलीच्या शीळफाटा परिसरात सध्या मोठ्या वेगाने लोकसंख्या वाढत असून वाढत्या लोकसंख्येनुसार या परिसरात वाहतूककोंडी, आरोग्य सुविधा, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. यातजेएनपीटीतून देशातील अन्य भागांत जाणारे कंटेनर या मार्गांवरून धावतात. त्यामुळे येथे वाहतूककोंडी, ध्वनी आणि वायुप्रदूषण नित्याचे आहे. आता वसाहतींमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.
पाणीटंचाई तीव्र होणार
सध्या महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा असल्याचे एमएमआरडीएने आपल्या २०१६-३६ च्या विकास आराखड्यात म्हटले आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०१७ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बारवीची उंची आणि मध्य वैतरणा वगळता पाण्याचे स्रोतात तसूभरही वाढ झालेली आहे. सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली आहेत. त्यांच्यासाठी जमीनच संपादित झालेली नाही.
सध्या वसई-विरार आणि मीरा-भार्इंदरला ३०८ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लीटर आहे. मात्र, सध्या भातसा, तानसा, वैतरणा, बारवी, चिखलोली आणि शहाड -टेमघरमधून १२१२ लीटरच पाणी मिळत आहे. शिवाय कर्जत-खालापूर परिसराला १२ दशलक्ष तर नवी मुंबई विमानतळा परिसरात २७ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. नव्या पाच एकात्मिक वसाहतींमुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवणार आहे. (उत्तरार्ध)
>कॉरिडोर, मेट्रोवर
नजर ठेवून जागाखरेदी
एमएमआरडीए क्षेत्रातील ज्या भागांत या पाच टाउनशिप येत आहेत. त्याच भागांतून ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो, कल्याण-तळोजा मेट्रो जाणार आहेत. शिवाय, केंद्र सरकारचा जेएनपीटी ते नवी दिल्ली फ्रेट कॉरिडोर आणि एमएमआरडीएचाच बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर जाणार आहे. यामुळे नगरविकास आणि एमएमआरडीएच्या नियोजन विभागातील काही वरिष्ठांना हाताशी धरून या धनदांडग्या बिल्डरांनी या जागा आधीच खरेदी करून त्याठिकाणी टाउनशिप उभारण्याचा सपाटा लावल्याची चर्चा आहे.

Web Title: Water scarcity will intensify as traffic congestion increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.