लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गणेशोत्सवानंतर ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयात सांगितले आहे. प्रत्यक्षात ही कारवाई सुरू होण्यापूर्वी आता शिल्लक राहिलेल्या ६८२ बांधकामांचे वीज, पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई होणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे. या बांधकामाधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असून, येथील घरे रिकामी करण्यासाठी नोटिसाही बजावणार असल्याचेही अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंब्रा-शीळ भागातील २१ बेकायदा इमारतींवर ठाणे पालिकेच्या वतीने कारवाई केली. नुकत्याच झालेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीत ठाणे पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ९०९ बेकायदा बांधकामांपैकी आतापर्यंत २२७ बांधकामांवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले. याशिवाय ४४ जणांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल केले. सध्या पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवानंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
७४० बांधकामे मुंब्रा, दिवा आणि शीळ भागात
पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ७४० बेकायदा बांधकामे ही मुंब्रा, शीळ आणि दिवा भागात आहेत. त्यातही यामध्ये २८५ झोपड्या, १९७ गोदाम आणि १६८ इमारतींचा समावेश आहे.
प्रभाग समिती अनधिकृत कारवाई अंशत: एकूण झालेली एमआरटीपी
बांधकामे कारवाई कारवाई गुन्हे
- नौपाडा कोपरी १० ०९ ०१ १० ०१
- वागळे ०७ ०७ ०० ०७ ००
- लोकमान्य सावरकर नगर १६ ०८ ०५ १३ ०५
- वर्तकनगर १४ १० ०४ १४ ००
- माजिवडा मानपाडा ३४ २७ ०७ ३४ ०४
- उथळसर १४ १२ ०२ १४ ०१
- कळवा ४२ ४० ०२ ४२ १२
- मुंब्रा ३२ १७ १५ ३२ १०
- दिवा ७४० ४५ १६ ६१ ११
- एकूण ९०९ १७५ ५२ २२७ ४४
५ हजार घरांसाठी १,०३,१६० अर्ज
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसोबतच ७७ जमिनीच्या विक्रीसाठी आयोजित लॉटरीला बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ३ हजार १६० अर्ज आले असून, यापैकी ६९ हजार ६९२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. कोकण मंडळाच्या यापूर्वीच्या लॉटरीला अगदीच किरकोळ प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावेळच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अर्जदारांचा आकडा शेवटच्या दिवसापर्यंत दीड लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टच्या रात्री ११:५९ पर्यंत अर्ज करता येईल. २९ ऑगस्टच्या रात्री ११:५९ पर्यंत अनामत रक्कम भरता येईल. ७ सप्टेंबर रोजी प्रारूप यादी जाहीर होईल. ९ सप्टेंबरला अर्जदारांना दावे, हरकती करता येतील.