वरसावे पुलाच्या मूळ बांधकामाचे नकाशेच नाहीत
By Admin | Updated: September 11, 2016 02:05 IST2016-09-11T02:05:28+5:302016-09-11T02:05:28+5:30
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सुमारे ५० वर्ष जुन्या वसई खाडीवर बांधलेल्या वरसावे पुलाच्या मूळ बांधकामाचे महत्वाचे नकाशेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उपलब्ध

वरसावे पुलाच्या मूळ बांधकामाचे नकाशेच नाहीत
धीरज परब, मीरा रोड
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सुमारे ५० वर्ष जुन्या वसई खाडीवर बांधलेल्या वरसावे पुलाच्या मूळ बांधकामाचे महत्वाचे नकाशेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुळे पुलाच्या दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यास विलंब होत आहे. एकीकडे ४५ पोलीस व ३० ट्रॅफिक वॉर्डन गेल्या आठवड्यापासून बंदोबस्तास लागले असून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबरपासून जुना पूल पूर्णपणे बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, प्राधिकरणाचे दिनेश अग्रवाल यांनीही मूळ नकाशे गॅमन इंडिया कंपनीकडून मागवले आहे. ते लवकरच उपलब्ध होतील असा दुजोरा दिला.
वसई खाडीवरील या जुना पुलाचे भूमिपूजन १९६४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले होते. जवळपास नऊ वर्षांनी पुलाचे काम पूर्ण झाले. १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले होते.
या आधीही एका गर्डरला तडा गेल्याने डिसेंबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यावेळी अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी, वाडा मार्गे वळवण्यात आली होती. तर नवीन पुलावरुन हलक्या वाहनांचीच वाहतूक होत असली तरीही कोंडी होऊन दोन तास लागत होते.
गेल्या महिन्यात जुन्या पुलाच्या मध्यभागातील गर्डरला तडा गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना पत्र देऊन पुलाचा वापर तातडीने बंद करण्यास कळवले. जिल्हाधिकाऱ्यांनीही जुना पूल १५ सप्टेंबरपासून बंद करण्याची अधिसूचना जारी केली. गेल्या आठवड्यापासूनच वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना जुन्या पुलावरुन प्रवेश बंद करण्यास सुरुवात केली. शिवाय हलक्या वाहनांनाही २० किलोमीटरपेक्षा कमी वेगात पुलावरुन जाण्याची मर्यादा घातली.
१५ सप्टेंबरपासून जुना पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने नवीन पुलावरुन मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने सोडली जाणार आहेत.