भिवंडीत उर्दू घर स्थापन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:54+5:302021-07-27T04:41:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी - भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाख इतकी असून, शहरात सुमारे ५६ टक्के मुस्लीम समाज ...

भिवंडीत उर्दू घर स्थापन करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी - भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाख इतकी असून, शहरात सुमारे ५६ टक्के मुस्लीम समाज आहे. मुस्लीम बांधवांची मातृभाषा ही उर्दू आहे. मात्र, शहरात उर्दू भाषेचे भव्य असे उर्दू घर नसल्याने उर्दू भाषिक विद्यार्थ्यांसह नागरिकांना शैक्षणिक व सांस्कृतिक अडचणी येतात. त्यामुळे भिवंडीत भव्य असे उर्दू घर स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे अल्पसंख्याक विकास व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
भिवंडी शहरात महानगरपालिकेअंतर्गत उर्दू भाषेतील ७० हून अधिक प्राथमिक शाळा उपलब्ध असून, खासगी संस्थांद्वारे ३० माध्यमिक शाळा उर्दू आहेत; तर ७ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरिता भिवंडीतील हजारो विद्यार्थी उर्दू भाषा निवडतात. पदव्युत्तर शिक्षण आणि पदवी शिक्षणाकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक तसेच मौलाना आझाद नॅशनल विश्वविद्यालय हैदराबाद अशा मुक्त विद्यापीठांद्वारे देखील भिवंडीतील हजारो विद्यार्थी उर्दू भाषेची निवड करून त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. दरवर्षी भिवंडीत जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी दहावी तर दोन हजारांहून अधिक विद्यार्थी बारावीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यामुळे भिवंडीतून वार्षिक सरासरी २५ ते ३० हजार विद्यार्थी उर्दू भाषेतून शिक्षण घेत असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून दिली.
राज्य शासनामार्फत एकूण सहा शहरांमध्ये उर्दू घर प्रस्तावित आहेत. राज्यात नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, मुंबई आणि मालेगाव या शहरांमध्ये प्रशस्त उर्दू घरांना शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, शासनाद्वारे उर्दू घराचा प्रस्ताव सादर व मंजूर करताना भिवंडी शहराचा त्यामध्ये उल्लेख केला गेला नाही. ठाणे जिल्ह्यातील उर्दू भाषिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या भिवंडी शहराचा यामध्ये उल्लेख झाल्यास त्याचा फायदा भिवंडीसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, शहापूर इत्यादी आजूबाजूच्या परिसरातील उर्दू भाषिकांना होणार आहे. त्यामुळे राज्य शासनास भिवंडी शहराकरिता उर्दू घर स्थापन करण्यास निधीच्या उपलब्धतेबाबत अडचण असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रुपये उपलब्ध करण्यास माझी तयारी असल्याची ग्वाही देखील आमदार शेख यांनी मंत्री मलिक यांना दिलेल्या लेखी निवेदनात दिली आहे.