उल्हासनगरची भुयारी गटार योजना मार्गी
By Admin | Updated: March 27, 2016 02:21 IST2016-03-27T02:21:34+5:302016-03-27T02:21:34+5:30
महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा

उल्हासनगरची भुयारी गटार योजना मार्गी
- सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे. मान्यता मिळताच निविदा काढून योजनेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.
शहरात १९८४ ते १९९३ दरम्यान महाराष्ट्र पाणीपुरवठा मलनि:सारण योजनेंतर्गत पालिकेने भुयारी गटार योजना राबवली. १९९३ मध्ये तीन लाख ६० हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरून २८ दशलक्ष लीटर क्षमतेची भुयार गटार योजना राबवली. आता लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या घरात गेली आहे. ती पुढील दहा वर्षांत आणखी वाढेल.
परिणामी, सध्याच्या गटारांची क्षमता संपली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. गटारांच्या दुरुस्तीवर पालिकेने दोन कोटी रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
त्यामुळे महापालिकेने नवीन भुयारी गटार योजना आखली. महापालिकेने सुरुवातीला २५४ कोटींची योजना केंद्र सरकारकडे पाठवली. २०२१ मधील १२ लाख लोकसंख्या गृहीत धरून १३५ दक्षलक्ष लीटर क्षमतेची योजना तयार केली आहे. त्यात नव्याने सुधारणा केल्याने २५४ कोटींची योजना आता ४०० कोटींवर गेली आहे. त्यासाठी २३३ कोटी रुपयांच्या निधीला महाराष्ट्र सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे.
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा
महापालिका पाणीपुरवठा विभागांतर्गत भुयारी गटार विभाग येतो. या विभागातर्फे गटारांची निगा व दुरुस्ती केली जाते. या विभागाकडे साफसफाईसाठी प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही.
त्यामुळे त्यांना खाजगी कंत्राटदारावर अवलंबून
राहावे लागत आहे. तसेच खडेगोळवली येथील बंद पडलेल्या मलनि:सारण केंद्रावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. या प्रकारच्या चौकशीची मागणी वारंवार झाली आहे. मात्र, पालिकेने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.
सांडपाणी थेट वालधुनी नदीत
महापालिकेचे २८ दशलक्ष लीटर क्षमतेचे खडेगोळवली येथील मलनि:सारण केंद्र
नावालाच सुरू आहे. शहरातील दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वालधुनी नदीत सोडले जात आहे.
शहरातील सांडपाण्यासह जीन्स कारखाने व अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखाने विषारी सांडपाणी सोडत असल्याने वालधुनी नदी प्रदूषित झाली आहे.