उल्हासनगरलाही कल्याण पॅटर्न

By Admin | Updated: September 9, 2016 03:05 IST2016-09-09T03:05:34+5:302016-09-09T03:05:34+5:30

उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला धोबीपछाड देत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजापाने कंबर कसली असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत विविध पक्षांच्या नेत्यांभोवती गळ

Ulhasnagar too welfare pattern | उल्हासनगरलाही कल्याण पॅटर्न

उल्हासनगरलाही कल्याण पॅटर्न

सदानंद नाईक, उल्हासनगर
उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला धोबीपछाड देत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजापाने कंबर कसली असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत विविध पक्षांच्या नेत्यांभोवती गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीप्रमाणे फौजदारी कारवाईचा धाक दाखवत काही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चाही दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोणार्क प्रकरणाची उकरून काढलेली चौकशी हा त्याच राजकारणाचा एक भाग मानला जातो. साई पक्षाच्या नेत्यांनी मात्र या प्रयत्नांना अद्याप दाद दिलेली नाही. त्यांनी स्वतंत्र लढण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. मात्र, काँग्रेसचे काही नेते सत्तेच्या वर्तुळात दाखल होण्यासाठी भाजपाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.
एकीकडे जुन्या प्रकरणांची सुरू झालेली चौकशी, पोलिसांमार्फत अप्रत्यक्ष येणारा दबाव आणि त्याच वेळी सत्तेतील पदे, अन्य वाटा देण्याचे आमिष दाखवत अन्य पक्षांतील मातब्बर नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेण्याचा लोकसभा, विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पॅटर्न राबवण्याची पूर्ण तयारी भाजपा नेत्यांनी केल्याचे सध्याच्या वेगवेगळ्या घडामोडींवरून दिसते.
भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी आयोजित केलेल्या राज्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला काँगे्रसचे स्वीकृत नगरसेवक अन्नू मनवानी यांच्यासह उद्योगपती महेश अग्रवाल उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेवर दशकभर शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. पण, या काळात भाजपाला सत्तेत नेहमी दुय्यम स्थान मिळाल्याची नाराजी पक्षात आहे. तत्कालीन महापौर आशा इदनानी यांच्या राजीनामा नाट्यावेळी माजी आमदार कुमार आयलानी यांच्यासह पक्षाच्या काही सदस्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की करत मारहाण केली होती. त्याचा राग अजूनही पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे पक्षाला एकहाती सत्तेत आणण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई आणि ठाण्यापेक्षा उल्हासनगरमध्ये पक्षाला यशाची संधी अधिक आहे. त्यातही राष्ट्रवादीची ओमी टीम आणि काँग्रेसमधील काही मातब्बर मंडळी पक्षात आल्यास त्या बळावर एकहाती सत्तेचे स्वप्न सहज साकार करता येईल, असा विश्वास नेत्यांना वाटतो. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक अस्तित्वहीन नेत्यांना काहीही न बोलण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आणि राज्यमंत्री रवींंद्र चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्यानंतरच्या स्नेहभोजनापासून भाजपाच्या हालचालींना वेग आल्याचे मानले जाते. या वेळी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आणि सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले कोणार्क कंपनीचे भागीदार अनू मनवानी यांच्यासह उद्योगपती महेश अग्रवाल यांची उपस्थिती बोलकी होती. काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस गोपी हसिजा यांच्याच घरी राज्यमंत्री चव्हाण यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्या पंक्तीला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, नेते राजेश वानखडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जयराम लुल्ला, काँग्रेस नगरसेविका जया साधवानी आदी उपस्थित होते. त्या वेळी या नेत्यांना पक्ष प्रवेशाचे साकडे घातल्याची माहिती कुमार आयलानी यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ओमी टीमपाठोपाठ काँग्रेस पक्षासाठीही भाजपाने गळ टाकल्याची व त्यासाठी राज्यमंत्रीच रिंगणात उतरल्याला पुष्टी मिळाली.
भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी कधी नव्हे त्या बाप्पाच्या दर्शनानिमित्त शहरात दोन दिवस ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांनी अनेकांच्या घरी देवदर्शनासाठी भेट दिली. अनेकांची मनधरणी केली.


पालिकेतील सत्तेच्या चाव्या दोन वेळा हाती ठेवणाऱ्या साई पक्षालाही भाजपाने प्रवेशासाठी गळ घातली होती. पक्षाचे नेते जीवन इदनानी यांनीच त्याची कबुली दिली.
आपला साई पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले. भाजपाचे वरिष्ठ नेते शहरात सक्रिय होऊन अनेकांची गळाभेट घेत असल्याचे चित्र आहे. पण, त्याबाबत स्थानिक पक्ष नेते आणि नगरसेवकांना काही एक न बोलण्याची तंबी देण्यात आली आहे.


भाजपामध्ये प्रवेश नव्हे, ही तर राज्यमंत्र्यांशी मैत्री
भाजपाचे नेते व राज्यमंत्री रवींंद्र चव्हाण माझे चांगले मित्र आहेत. पक्षाचे सरचिटणीस गोपी हसिजा यांच्याकडे स्नेहभोजन झाले. त्याला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, नेते राजेश वानखडे आले होते. काँग्रेसच्या नगरसेविका जया साधवानी याही उपस्थित होत्या. मध्यवर्ती रुग्णालयाला सीटी स्कॅन मशीनसह डायलिसीस यंत्रणा मिळावी, अशी मागणी त्या वेळी मी पक्षाच्या वतीने केली. चव्हाण चांगले मित्र असल्याने ते फक्त जेवणासाठी आले होते. त्यातून लगेच पक्ष प्रवेशाचा प्रश्नच येत नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवासी राहणार आहे.
- डॉ. जयराम लुल्ला, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, उल्हासनगर

Web Title: Ulhasnagar too welfare pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.