धाकधूक केवळ निकालाची, चार मतदारसंघात चुरस : प्रस्थापित धक्के देणार की खाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 05:22 PM2019-10-23T17:22:13+5:302019-10-23T17:25:16+5:30

ठाण्यातील चारही मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडली आहे. परंतु, कमी झालेल्या टक्केवारीची चर्चा मात्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.

tough fight in 4 assembly constituency of thane, established candidate in danger zone or simply won | धाकधूक केवळ निकालाची, चार मतदारसंघात चुरस : प्रस्थापित धक्के देणार की खाणार

धाकधूक केवळ निकालाची, चार मतदारसंघात चुरस : प्रस्थापित धक्के देणार की खाणार

Next

अजित मांडके

ठाणे : विधानसभेसाठी मतदान पार पडले असून शहरातील चार मतदारसंघातील निकालाकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. या चार पैकी तीन मतदारसंघात मतांची टक्केवारी घटली आहे. तर केवळ मुंब्रा-कळवा मतदारसंघात ती टक्केवारी काहीशी वाढली आहे. परंतु, आता या चार मतदारसंघातील ४१ उमेदावारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निकालाची धाकधूक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मतदान कमी झालेल्या मतदारसंघात कोणत्या भागात मतदान कमी झाले याचीही चर्चा होऊ लागली असून त्याचा फटका कोणाला बसणार यावरही उहापोह सुरू आहे. तर कुठे यावेळेस चमत्कार घडणार, उद्याच्या वृत्तपत्रांची हेडलाईन काय असेल, पुन्हा प्रस्थापितच बाजी मारणार की, त्यांना धक्के बसणार आदींवर दिवसभर खलबते सुरू होती.

ठाण्यातील चारही मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडली आहे. परंतु, कमी झालेल्या टक्केवारीची चर्चा मात्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात यंदा ५२.४७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागील वेळेस ५६.५६ टक्के मतदानाची नोंद येथे झाली होती. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार यावरून अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. भाजपचा मित्र पक्ष असलेली शिवसेना यावेळेस संपूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरली होती का?, त्यांनी भाजपला १०० टक्के मदत केली होती का?, यावरच निकाल लागणार आहे. का त्यांनीही आतून मनसेसाठी काम केले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांचा मनसेला फायदा होणार का?, केळकर पुन्हा कित्ता गिरवणार की?, मनसेचे जाधव या मतदारसंघात केळकरांना धक्का देणार यावरही राष्टÑवादीचे कार्यालय, मनसेच्या कार्यालयात चर्चा सुरू होत्या.

दुसरीकडे कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाची ही लढाई मानली जात आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रथमच या शिवसेनेच्या बालेकिल्यात सभा घेतल्याने त्यावरूनही आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांची ताकद कमी झाल्यानेच ठाकरेंवर मतदारसंघात सभा घेण्याची वेळ आल्याची चर्चा येथे चांगलीच रंगत आहे. क्लस्टरच्या मुद्यावरून या मतदारसंघात चांगलेच रान पेटले होते. मात्र, मागील १५ वर्षे या मतदारसंघात कोणत्याही प्रकारची कामे झाली नाहीत. परंतु, दुसरा सक्षम पर्यायही नसल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळाली. त्यातही या मतदारसंघातही मागील वेळेपेक्षा कमी मतदान झाले असून यंदा येथे ४९.०९ टक्के मतदान झाले असून जे मागील निवडणुकीपेक्षा ४ टक्यांनी कमी आहे. काँग्रेस, मनसे आणि वंचितच्या क्लस्टर विरोधाच्या लढाईत शिंदेचे क्लस्टरचे स्वप्न साकार होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तिकडे ओवळा माजिवडा मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि मनसेतील लढाईत सरनाईक हॅटट्रिक मारणार का? अशी चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातही ८ टक्यांनी मतदानात घट झाली आहे. त्यामुळे घटलेल्या या मतदानाचा फटका कोणाला बसणार अशी चर्चा सलग दुसºया दिवशीही या मतदारसंघात सुरू होती. अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचा मुद्दा विरोधकांकडून निवडणुकीत भांडवल करण्यात आला होता. त्याचा फटका सरनाईकांना बसेल, अशी चर्चा सुद्धा आहे. मात्र, विरोधी बाकावरीलही उमेदवार सक्षम नसल्याने सरनाईक हॅटट्रिक साधतील अशीही चर्चा सुरू होती.

तर मुंब्रा - कळवा मतदारसंघात एक राजकीय बाकावरील कलाकार विरुद्ध स्टेजवरील कलाकार अशी लढत रंगतदार स्थितीत झाली आहे. शिवसेनेने दीपाली सय्यद यांना उमेदवारी देऊन एक चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मागील १० वर्षांतील विकास कामांवर जितेंद्र आव्हाडांच्या बाजूने कौल जाईल, अशी चर्चा कळवा, मुंब्य्रात रंगली होती. परंतु, कलाकाराला मानणारादेखील वर्ग येथे असल्याने चेहºयाकडे बघून मतदान झाल्यास त्याचा फटका आव्हाडांना बसेल. मात्र, कामाकडे बघून मतदान झाले असल्यास त्याचा फटका शिवसेनेला बसेल, अशीही चर्चा या भागात रंगत आहे. याच मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत २ टक्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ती विकासकामांसाठी झाली की सिनेअभिनेत्री निवडणुकीत उतरल्याने झाली हे आता स्पष्ट होणार आहे.

ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान चारही आमदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. तर ठाणे शहरमध्ये भाजपचे संजय केळकर यांच्यासाठी ही लढत अतिशय निर्णायक ठरली आहे. सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला विरोध होता. त्यांच्याच पक्षातील अनेकांनी त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता. तर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हा मतदारसंघ हवा म्हणून हट्ट करीत होते. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेने १०० टक्के मदत केली असेल तरच केळकरांचे चांगलभलं होणार आहे. अन्यथा या ठिकाणचा निकाल बदलण्यास शिवसेना कारणीभूत ठरणार हेदेखील तितकेच सत्य मानले जात आहे.

Web Title: tough fight in 4 assembly constituency of thane, established candidate in danger zone or simply won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.