Thane: ... तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, संमेलनाध्यक्ष राजन गवस यांनी व्यक्त केली चिंता
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 30, 2023 16:32 IST2023-07-30T16:31:42+5:302023-07-30T16:32:00+5:30
Thane: आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल अशी चिंता जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली.

Thane: ... तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, संमेलनाध्यक्ष राजन गवस यांनी व्यक्त केली चिंता
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल अशी चिंता कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली. आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे. तेव्हा जबाबदारी लिहीणाऱ्याची येते. त्यामुळे या आजारी महाराष्ट्राचे किमान संवेदनशील महाराष्ट्रात रुपांतर करणे ही आजची गरज आहे अशी अपेक्षा त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
रविवारी आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहामध्ये हे संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गवस म्हणाले की, मी गेली ४४ वर्षे लिहीत आहे, परंतू कधी नव्हे तर महाराष्ट्र हा आजारी पडला आहे, हा आजारांचा प्रदेश आहे. सामान्यांच्या प्राथमिक गरजा भागवणारी कल्याणकारी राज्याची संकल्पना होती. परंतू या संकल्पनेपासून आपण खूप दूर जाऊन नव्या भांडवली व्यवस्थेत आहोत, जिथे महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र ही मरणपंथावर आहेत, मल्टीस्पेशलिटीने गोरगरिबांचे शोषण केले आहे, शिक्षणाची मंदिरे न राहता तिथे दुकानदारी सुरू झाली आहेत.
एका बाजूला आरोग्याची हेळसांड, दुसरीकडे शिक्षणाची दुकानदारी सुरू आहे तर तिसऱ्या बाजूला संपूर्ण शेतीची उद्ध्वस्थता आहे. नद्यांची गटारे झाली आहेत, महानगरात येणाऱ्या सगळ्या महामार्गांमुळे असंख्य शेतकरी भूमीहीन होत आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे,पर्वतरांगा कोसळत आहेत, यात गोरगरीब मरत आहे, या गोरगरिबाचा श्वास आपल्या साहित्याच्या केंद्रापर्यंत कधीतरी यायला हवा. साहित्यिकाच्या मनात या संपूर्ण व्यवस्थेचे प्रश्न येणे गरजेचे आहे. सगळीकडे संशय आणि संभ्रम आहे, आवाजांचा गलबलाट, गोंगाट आहे आणि यातून निर्माण झालेला संभ्रम समाजाला मनोरुग्ण करत आहे. त्यामुळे या समाजाला आता मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. सामान्य माणसासाठी त्याने आवाज बुलंद केला पाहिजे असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले.
दरम्यान, कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष सुनील चौधरी, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत ज्येष्ठ कवी अशोक बागवे, जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, विलास जोशी, विलास ठुसे व इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला बहर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.