देशाचा गौरव फक्त सजग नागरिकांमुळे शक्य; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:25 IST2025-01-28T08:25:19+5:302025-01-28T08:25:19+5:30
भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या झेंडावंदनप्रसंगी ते बोलत होते.

देशाचा गौरव फक्त सजग नागरिकांमुळे शक्य; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : देश प्रगती करत आहे. जगात देशाचा गौरव होत आहे. हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजग नागरिकांमुळे शक्य होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या झेंडावंदनप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, कार्याध्यक्ष बी. डी. काळे, उपाध्यक्ष अरुणा जाधव, सरचिटणीस रोहित जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भोईर, मुख्याध्यापक सुधीर घागस उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केले. असेच अनेकांनी देशासाठी त्याग केला. आज आपण आपल्या कर्तव्यासह जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परंपरांची जपणूक करीत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म आहे. समाजाचे सहयोग घेऊन समाजासाठी कार्य करणे हाच खरा धर्म आहे. देश पुढे जात असताना येथील भारतीयांची प्रतिष्ठा वाढली असून कोण किती कमावते त्यापेक्षा समाजासाठी किती वाटतो त्यावर माणसाची प्रतिष्ठा ओळखली जाते असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेतर्फे विजय जाधव यांनी डॉ. भागवत यांना रामलल्लाच्या मूर्तीसोबत संस्थापक अण्णासाहेब जाधव यांचे चरित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला.