ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प अडकला धामणकर नाक्यावर; पुढचा मार्ग निश्चित नसल्याने काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 14:55 IST2021-06-28T14:55:34+5:302021-06-28T14:55:52+5:30
ठाणे बाळकुम भिवंडी कल्याण नाका मार्गे कल्याण या २४. ९० किमी लांबीच्या मार्गासाठी ८४१६ . १५ कोटी रुपये खर्च केल्या जाणाऱ्या या मार्गाचा भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प अडकला धामणकर नाक्यावर; पुढचा मार्ग निश्चित नसल्याने काम रखडले
- नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी बहुचर्चित ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प पाच मधील दुसऱ्या फेज मधील भिवंडी कल्याण मार्गाचा विकास आराखडा अजूनही बासनात असल्याने ठाणे भिवंडी या पहिल्या फेज मधील काम सुमारे ६० टक्के पूर्ण होत आले असताना पुढील काम अडखळत सुरू असल्याने सध्या तरी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो भिवंडीत अडकली आहे. धामणकर नाक्या पर्यंत मेट्रोचे काम मोठ्या ताकदीने व जलद गतीजने करण्यात आले आहे मात्र त्यापुढे हे काम सरकले नसल्याने मेट्रो प्रकल्पाचे काम याच ठिकाणी येऊन थांबले आहे .
ठाणे बाळकुम भिवंडी कल्याण नाका मार्गे कल्याण या २४. ९० किमी लांबीच्या मार्गासाठी ८४१६ . १५ कोटी रुपये खर्च केल्या जाणाऱ्या या मार्गाचा भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. परंतु भिवंडी शहरातील मार्ग आज ही निश्चित झाले नसल्याने मेट्रो जाणार कोठून हा प्रश्न उपस्थित होत आहे . या मेट्रोचे नियोजित भिवंडी शहरातील मार्ग अंजुरफाटा , धामणकर नाका , कल्याण नाका येथून राजनोली नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार होती परंतु त्याच दरम्यान कल्याण नाका ते राजनोली नाका दरम्यान एमएमआरडीए ने उड्डाणपूल बनविल्याने या मार्गावर पुन्हा मेट्रो साठी मोठया प्रमाणावर रस्ता रुंदीकरण करण्याची गरज असून त्यास येथील व्यापारी व स्थानिक निवासी नागरिक या सर्वांचाच विरोध होत आहे .त्यामुळे भिवंडी वंजारपट्टी नाका पोगाव मार्गे मेट्रो मार्ग वळविण्याचा एक पर्याय समोर आला परंतु तो खर्चिक व कमी उपयोगात येणार असल्याने त्यास आजही प्रतिसाद मिळाला नाही .
भिवंडीतून जाणाऱ्या या मेट्रोचे काम ठाणे बाळकुम ते भिवंडीतील धामणकर नाका पर्यंत काम युद्ध पातळीवर सुरू असून काही ठिकाणी पिलर व त्यावरील आडव्या तुळई टाकून काम पूर्ण होत आले पण त्यापुढे धामणकर नाका ते कल्याण च्या दिशेने जाणार मार्ग अजून ही निश्चित नसून त्या कामाबाबत निविदा प्रक्रिया सुध्दा सुरू झाली नसल्याने मेट्रो १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्णत्वास जाणार होता परंतु ठाणे येथून सुरू झालेले काम भिवंडीतील धामणकर नाका येथे येऊन थांबले असल्याने या कालावधीत पूर्ण होईल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने भिवंडीकरांच्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून नेमकी किती कालावधी लागणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.