अमृत शहरांत ठाणे सर्वोत्तम; केडीएमसी, भिवंडीला ठेंगा; पर्यावरण संवर्धनात सर्वोत्कृष्ट कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 08:57 IST2021-06-06T08:56:43+5:302021-06-06T08:57:03+5:30
environmental conservation : या स्पर्धेत ४३ शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यांमधील अमृत शहरांच्या गटामध्ये ठाणे महापालिकेला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे शहर’ म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.

अमृत शहरांत ठाणे सर्वोत्तम; केडीएमसी, भिवंडीला ठेंगा; पर्यावरण संवर्धनात सर्वोत्कृष्ट कामगिरी
ठाणे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून २०२०-२१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित घेतलेल्या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेने प्रथम स्थान पटकाविले. महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ऑनलाइनद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
या स्पर्धेत ४३ शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यांमधील अमृत शहरांच्या गटामध्ये ठाणे महापालिकेला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे शहर’ म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमास महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, उपनगर अभियंता अर्जुन अहिरे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड उपस्थित होते.
५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने केली. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर व महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिका सहभागी झाल्या होत्या.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमृत शहरे, नगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायत अशा एकूण ६८६ संस्थांमध्ये स्पर्धा झाली. भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांमध्ये १ जानेवारी २०२० ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले. वृक्षलागवड, जलसंवर्धन, हवाप्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जाबचत व पर्यावरणाबाबत जनजागृती याबाबतच्या कामांचे मूल्यमापन करून ते ध्वनिचित्रफितीद्वारे शासनाला सादर केले होते. यामध्ये ठाणे महानगरपालिकेची सर्वोत्तम १० शहरांमध्ये निवड झाली होती. पुन्हा शासनाने ऑनलाईनद्वारे महापालिकेने केलेल्या कामांचे मूल्यांकन केले.
नवी मुंबई द्वितीय, मुंबई महापालिका तृतीय
ठाणे महापालिकेची कामगिरी अव्वल ठरली व अमृत सिटी म्हणून ठाणे महापालिकेस प्रथम पारितोषिक प्राप्त झाले; तर द्वितीय क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका, तृतीय क्रमांक बृहन्मुंबई महानगरपालिकेस देण्यात आला.
प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पुणे महापालिकेला, द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून बार्शी व नाशिक महानगरपालिकेस देण्यात आले. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान व त्यांच्या संपूर्ण टीमचे महापौर व आयुक्तांनी अभिनंदन केले.