राजकीय नेत्यांशिवाय स्मार्ट सिटी अशक्यच
By Admin | Updated: June 19, 2016 04:17 IST2016-06-19T04:17:55+5:302016-06-19T04:17:55+5:30
एखादे शहर स्मार्ट करायचे असेल तर त्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. तो वाढवण्यात राजकारण्यांची भूमिका,, इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आमच्या सहभागाशिवाय स्मार्ट सिटी

राजकीय नेत्यांशिवाय स्मार्ट सिटी अशक्यच
कल्याण : एखादे शहर स्मार्ट करायचे असेल तर त्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. तो वाढवण्यात राजकारण्यांची भूमिका,, इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आमच्या सहभागाशिवाय स्मार्ट सिटी अशक्य आहे. त्यामुळे आम्हालाच सर्व कळते अशा भ्रमात प्रशासकांनी राहू नये, असा अप्रत्यक्ष इशाराच स्मार्ट सिटी शिखर परिषदेच्या व्यासपीठावरून देण्यात आला.
स्मार्ट सिटीचे सर्व प्रस्ताव, त्याची आखणी, त्यांच्या योजना, त्यातील प्रकल्प, त्यांच्या पॅकेजबाबत सध्या सर्व महापालिकांचे आयुक्तच सर्व निर्णय घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध महापालिकांच्या महापौर आणि अन्य नेत्यांनी राजकीय नेत्याची इच्छाशक्ती, त्यांचा सहभाग असल्याशिवाय नागरिकांचा सहभाग वाढणार नाही, असे सांगत प्रशासकीय यंत्रणेला इशारा दिला.
प्रशासनाने अत्याधुनिक सेवा-सुविधा दिल्या. मात्र सेवा घेणारे नागरिक स्मार्ट नसतील, तर त्या स्मार्ट सेवेचा काहीही उपयोग होत नाही. नागरिकांचा सहभाग वाढविण्याची अधिक जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. ती राजकीय इच्छाशक्ती जोपर्यंत वाढीस लागत नाही, तोवर स्मार्ट सिटीचे नियोजन सफल होऊ शकत नाही, असा सूर स्मार्ट सिटी शिखर परिषदेत सहभागी झालेल्या राजकीय मंडळींनी लावला.
कल्याण डोंबिवली महापालिकेने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी शिखर परिषदेची शनिवारी सांगता झाली. त्यापूर्वी ‘स्मार्ट सिटी होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती’ या विषयावर चर्चा झाली. त्यात कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, ठाण्याचे महापौर संजय मोरे, वाराणशीचे महापौर गोपाल मोहले आणि रायपूरचे महापौर प्रमोद दुबे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकाला सर्व काही कळते, असे त्याने समजू नये, असे परखड मत नोंदवत ठाण्याचे महापौर संजय मोरे म्हणाले, राजकीय मंडळींना विश्वासात घेऊन प्रशासकाने विकासकामे केल्यास शहर नक्कीच स्मार्ट होईल. नागरिकांचा सहभाग वाढविण्याची जबाबदारी राजकीय मंडळीची आहे. ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू.
शिवसेना गटनेते जाधव यांनी या शहरात स्मार्ट सिटीची मुहूर्तमेढ यू. पी. एस. मदान, टी.चंद्रशेखर, श्रीकांत सिंह यांनी रोवल्याचा दाखला दिला.
माजी स्थायी समिती सभापती म्हात्रे यांनी, कोपर गावात ग्रामपंचायतीच्या काळात तयार केलेले रस्ते पुन्हा महापालिकेने नव्याने तयार केले नसल्याकडे लक्ष वेधले. स्मार्ट सिटी होत असताना शहराच्या वेशीवरील गावेही विकसित व्हावी, असे मत नोंदवले. स्मार्ट विकास हा केवळ एका विशिष्ट भागापुरता न होता तो सर्वसमावेशक व्हावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
दोन दिवसांच्या शिखर परिषदेतून जे विचारमंथन झाले. त्यातून नक्कीच चांगले बाहेर पडेल. स्मार्ट सिटीत कल्याण-डोंबिवलीचा नक्कीच समावेश होईल, अशी आशा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केली. देशात अशा प्रकारची परिषद प्रथमच आयोजित करण्याचा मान कल्याण डोंबिवलीस मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्मार्ट सिटीसाठी नागरिकांच्या सवयी बदलण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरूच्चार केला. सवयी चांगल्या असल्या, तरच नागरिक स्मार्ट सेवांचा स्मार्ट उपभोग घेऊ शकतात, याकडे देवळेकर यांनी लक्ष वेधले.
रायपूरचे प्रदूषण सायकलींमुळे घटले
स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत रायपूर स्मार्ट सिटीकरीता निवडले गेले, याचा उल्लेख तेथील महापौर दुबे यांनी केला. त्यावेळी स्पेशन परपज व्हेईकल अर्थात एसपीव्हीने गच्चीवर बागा नसल्याची त्रुटी दाखविली होती आणि भुवनेश्वरमधील गच्चीत बाग फुलविल्याची माहिती दिली होती.
रायपूर शहरात सकाळी सात ते सव्वा आठ या वेळेत सगळ््यांनी सरकारी वाहनाने अथवा सायकलने प्रवास करावा असा दंडक घातला आहे. खाजगी वाहने या काळात बंद असतात. त्यामुळे प्रदूषण ३७ टक्क्यांनीघटले. इतर शहरांनी त्याचे अनुकरण केल्यास प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल. पालिकांनी अवास्तव लक्ष्य ठेवू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
ऐतिहासिक वारसा जपा! :वाराणशी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आल्याने या शहराला वेगळे महत्व आहे, असा दाखला देत
वाराणशीचे महापौर मोहले यांनी सांगितले, या शहरात ४३ हजार मंदिरे आहे. ही भूमी संतांची आणि संगीताची आहे. कलाक्षेत्र आहे. पुरातन वास्तूला हात न लावता हे शहर स्मार्ट करण्याचे काम केले जात आहे. कल्याणमध्येही ऐतिहासिक वास्तू आहेत. त्याचाही विकास वाराणशीच्या धर्तीवर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.