सहा प्रभाग समितींवर शिवसेनेचा कब्जा, राष्ट्रवादीच्या वाटेला दोन तर भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:50 IST2017-11-22T15:31:21+5:302017-11-22T15:50:36+5:30
नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनाला नऊ तर भाजपाला सात मते पडली. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाटेला सहा प्रभाग समिती, राष्ट्रवादीच्या वाटेला दोन आणि भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती आली आहे.

सहा प्रभाग समितींवर शिवसेनेचा कब्जा, राष्ट्रवादीच्या वाटेला दोन तर भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती
ठाणे - मागील नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणुकीची प्रक्रिया अखेर बुधवारी पार पडली. त्यानुसार सात प्रभाग समित्यांची अध्यक्षांची निवड यापुर्वीच बिनविरोध झाली होती. दरम्यान बुधवारी नौपाडा आणि कळव्यासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यावेळी कळव्यासाठी शिवसेनेने आपला अर्ज मागे घेतल्याने येथील निवडही बिनविरोध झाली. परंतु नौपाड्यासाठी शिवसेना विरुध्द भाजपा अशी लढत झाली. यामध्ये शिवसेनेला ९ तर भाजपाला सात मते पडली. त्यामुळे या प्रभाग समितीवर देखील शिवसेनेने कब्जा केला. त्यानुसार आता शिवसेनेच्या ताब्यात सहा, राष्ट्रवादी दोन आणि भाजपाच्या वाटयाला एक प्रभाग समिती आली आहे.
ठाणे महापालिकेत एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्या देखील निवडणुका रखडल्या होत्या. परंतु नऊ महिन्यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुका लागल्या. मागील महिन्यात महासभेत शहरातील प्रभागाची पुनर्रचना करण्यात आली. दहा प्रभाग समिती एकने कमी करुन नऊ करण्यात आल्या. त्याची निवडणुक बुधवारी पार पडली. त्यानुसार मागील आठवड्यात या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले. त्यानुसार कोपरी- नौपाडा येथे शिवसेना आणि भाजपात चुरस लागली होती. येथे शिवसेनेचे नऊ नगरसेवक तर भाजपाचे सात नगरसेवक आहेत. भाजपाला ही प्रभाग समिती हवी होती. त्यामुळेच त्यांच्या पक्षातील सुनेशी जोशी यांनी अर्ज भरला होता. तर शिवसेनेच्या वतीने शर्मिला गायकवाड यांनी अर्ज भरला होता. बुधवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली आणि भाजपाला सात आणि शिवसेनेला नऊ असे मतदान झाले. त्यानुसार शर्मिला गायकवाड या आता नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षा झाल्या आहेत. तर कळवा प्रभाग समितीसाठी शिवसेनेच्या वतीने पुजा करसुळे यांनी अर्ज भरला होता. परंतु आज निवडणुकीच्या वेळेस त्यांनी अर्ज मागे घेतला. तशीही ही प्रभाग समिती राष्ट्रवादीच्याच वाटेला जाणार होती. त्यानुसार आता राष्ट्रवादीचे महेश साळवी हे अध्यक्ष झाले आहेत.
दरम्यान उथळसर प्रभाग समितीत नंदा पाटील (भाजपा), वागळे माणिक पाटील, माजिवडा मानपाडा सिधार्थ ओवळेकर, वर्तकनगर - रागीणी बैरीशेट्टी, लोकमान्य सावरकरनगर - कांचन चिंदरकर, नव्याने तयार झालेल्या दिवा प्रभाग समितीत शैलेश पाटील या सर्व शिवसेना नगरसेवकांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. तर मुंब्रा प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीच्या अनिता केणी यांची बिनविरोध निवड झाली आहे.