शिवसेनेने शब्द पाळला नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:51 IST2018-05-21T01:51:26+5:302018-05-21T01:51:26+5:30

हाच न्याय शिवसेनेने वनगा यांच्या पश्चात होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबत लावायला हवा होता, अशी आमची इच्छा होती.

Shiv Sena does not follow the word; Commentary on Devendra Fadnavis | शिवसेनेने शब्द पाळला नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

शिवसेनेने शब्द पाळला नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

कासा : भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारसभेत रविवारी येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, जेव्हा पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाले त्या वेळी शिवसेनेने त्यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी दिली. तेव्हा भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या प्रचारासाठी मी सभा घेतली होती आणि ते विजयी झाले. हाच न्याय शिवसेनेने वनगा यांच्या पश्चात होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबत लावायला हवा होता, अशी आमची इच्छा होती.
उद्धवजींशी माझी याबाबत चर्चा झाली होती आणि श्रीनिवासला या पोटनिवडणुकीची उमेदवारी देणार आहोत तर आपण त्याला पाठिंबा द्यावा, असे त्यांना सांगितले होते. त्यांनी मला सुभाष देसार्इंशी चर्चा करायला सांगितली. त्यांच्याशीही माझी चर्चा झाली. श्रीनिवासला आणि वनगा कुटुंबाला कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते; परंतु शिवसेनेने आपला शब्द पाळला नाही. अरे, मोठ्या भावाच्या परिवारात काही उणेदुणे झाले, त्याच्या पुत्राच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले तर धाकट्या भावाने दूर करायचे का त्याला त्या परिवारापासूनच तोडायचे? ही संस्कृती भाजपाची नाही.
वनगा यांनी अत्यंत संघर्षाने या जिल्ह्यात पक्षबांधणी केली. आदिवासींच्या समस्यांवर सतत आवाज उठवला. तसाच आवाज राजेंद्र गावीत हे उठवत होते. संघर्ष करीत होते. म्हणून मी त्यांना काही महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो आपण भाजपामध्ये या आणि आपल्या समाजाच्या समस्या सोडवून घ्या. त्यानुसार ते आले, याबद्दल मला समाधान वाटते.
मी वनगांना सांगू इच्छितो, त्यांनी शिवसेनेला पुरते ओळखलेले नाही. निवडणुकीपुरती सेनेला वनगा कुटुंबीयांची आठवण झाली आहे. एकदा का निवडणुकीचा निकाल लागला की पराभूत झालेल्या श्रीनिवासकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे शिवसेना ढुंकूनही बघणार नाही. हे त्यांनी आताच लक्षात ठेवावे. आम्ही यापूर्वीही त्यांना वाºयावर सोडले नव्हते आणि यापुढेही सोडणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेली आदिवासींची खावटी चालू करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथील जाहीर सभेत केली.

‘छायाचित्र वापरू नका’
पालघर : माझे पती दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे छायाचित्र भाजपा सर्वच प्रचार साहित्यावर वापरत आहे. हा वापर तातडीने थांबवावा, असे साकडे वनगा यांच्या पत्नी जयश्री यांनी निवडणूक आयोगाला घातले आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी आपला आक्षेप नोंदविला असून ही बाब आचारसंहितेचा भंग करणारी आहे, असेही म्हटले आहे.

Web Title: Shiv Sena does not follow the word; Commentary on Devendra Fadnavis