‘तिच्या इच्छेचा सन्मान अवयवदानातून राखला’ ज्योती नारकर यांच्यामुळे दोन जणांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:59 IST2025-01-22T09:58:23+5:302025-01-22T09:59:10+5:30
Mumbai News: पवई येथे राहणाऱ्या ज्योती नारकर (६१) यांना चक्कर आल्यामुळे त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शुक्रवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले.

‘तिच्या इच्छेचा सन्मान अवयवदानातून राखला’ ज्योती नारकर यांच्यामुळे दोन जणांना जीवनदान
मुंबई - पवई येथे राहणाऱ्या ज्योती नारकर (६१) यांना चक्कर आल्यामुळे त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शुक्रवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ज्योती यांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा सन्मान राखत त्यांचे अवयव दान केले. त्यांच्या अवयवदानामुळे दोन जणांना जीवनदान मिळाले आहे. त्यांचे पती व चित्रपट निर्माते नितीन वैद्य म्हणाले १७ जानेवारी रोजी ज्योती यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अवयवरूपी ती जिवंत
जिवंतपणीच बायकोने अवयदानासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती, ती मी आणि माझी मुलगी मीरा वैद्य यांनी पूर्ण केली. ती शरीररूपाने आमच्यासोबत नसली तरी आज दोन जणांना जीवदान देऊन अवयवरूपी समाजात जिवंत आहे, असे नितीन वैद्य म्हणाले.
चौथे अवयवदान
मुंबई विभागातील या वर्षातील हे चौथे अवयवदान आहे. या अवयवदानातून एक किडनी आणि यकृत दान करण्यात आले आहे.
राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही.
अवयवदान वाढवण्यासाठी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.