युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील

By Admin | Updated: September 12, 2016 03:08 IST2016-09-12T03:08:29+5:302016-09-12T03:08:29+5:30

बदलापूरच्या विकासासाठी जे काही चांगले करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने युतीचा प्रस्ताव ठेवला होता

Senior decision makers will take the decision | युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील

युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील

बदलापूर : बदलापूरच्या विकासासाठी जे काही चांगले करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने युतीचा प्रस्ताव ठेवला होता. या निर्णय प्रक्रियेत आपण कुठेच नव्हतो. स्थानिकांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिवसेनेने आता आपला शब्द न पाळल्याने सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे यापुढे युती करायची की नाही, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेण्यात येईल, असे आमदार किसन कथोरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कुळगाव-बदलापूर पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असली तरीही विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात छुपा करारनामा करण्यात आला. त्यानुसार, भाजपाला एक सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपद देण्यात येणार होते. मात्र, उपनगराध्यक्षपद देण्यासाठी शिवसेना चालढकल करीत आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला. शिवसेनेच्या भूमिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त करत भाजपाने स्थानिक पातळीवरच निर्णय घेत युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर सभापतीपदाचा राजीनामा देऊन विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे.
शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाढलेल्या दरीसंदर्भात चर्चा सुरू असताना आमदार कथोरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाने आपली बाजू स्पष्ट केली. बदलापूरमध्ये युती करण्याच्या निर्णय प्रक्रियेत आपण सहभाग घेतला नव्हता. स्थानिक नगरसेवक आणि जिल्ह्याच्या नेत्यांनीच पुढाकार घेऊन हा निर्णय घेतल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. आता शिवसेना शब्द पाळत नसल्याने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णयही नगरसेवकांनीच घेतला आहे. मात्र, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर खासदार कपिल पाटील यांची बोलणी सुरू आहे. या बोलणीत काय निर्णय होणार, याची प्रतीक्षा आम्ही करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुसरीकडे शिवसेनेला भाजपाकडून डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. बदलापूरमध्ये अनागोंदी कारभार सुरू असेल तर आमदार म्हणून नागरिकांच्या बाजूने लढण्याची आपली तयारी आहे. नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असताना नागरिकांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे, ही भूमिका भाजपाची राहील. तीन वर्षांत पालिकेत कोणती ठोस कामे झाली, याचे एकही उदाहरण बदलापूरमध्ये दिसत नाही. जी काही कामे शहरात सुरू आहेत, ती सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून सुरू आहे. आमदार म्हणून आपण राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात बदलापूरसाठी निधी आणला आहे. मात्र, त्या निधीचाही योग्य विनियोग होत नसेल तर पालिकेच्या कामकाजावर स्पष्ट नाराजी दाखवण्याचा आपला अधिकार आहे.
नाट्यगृह आणि प्रशासकीय इमारतीसाठी राज्य सरकारने अनुदान दिलेले असतानाही तो खर्च करण्याचे कामही पालिका करत नाही. त्यामुळे नव्याने निधी घेण्यात अडचणी येत आहेत. पालिकेने जबाबदारीने कामे केली, तर शहराचा चेहरा बदलण्यास मदत होईल, असे कथोरे यांनी स्पष्ट केले. शहरात कामे न होताच बिले निघत असल्याने आपण आता पालिकेतील कामांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. ही माहिती संकलित झाल्यावर कोणती कामे झाली आणि कोणती नाही हे कळेल.
शहरवासीयांवर करवाढ लादत असताना त्यांना सुविधा देण्याचे काम झालेच पाहिजे. मात्र, ते काम पालिकेमार्फत होत नसल्यानेच आपण उघडपणे विरोध करत आहोत. शेवटी, आमची नाळ ही नागरिकांच्या समस्यांसोबत जोडलेली आहे. त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Senior decision makers will take the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.