स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या विरोधात राष्ट्रवादीने घेतला आक्षेप, पुन्हा जाणार न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:04 IST2018-05-09T15:04:22+5:302018-05-09T15:04:22+5:30
स्थायी समिती सभापती निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर ही निवडणुक प्रक्रिया असल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच निवड प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितले आहे.

स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या विरोधात राष्ट्रवादीने घेतला आक्षेप, पुन्हा जाणार न्यायालयात
ठाणे - सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लावण्यात आली आहे. परंतु ही निवडणुक प्रक्रियाच बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच ही निवडणुक प्रक्रिया पार पडावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर या निवडणुक प्रक्रियेच्या विरोधात भाजपाने देखील न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थायी समिती गठीत होण्याच्या प्रक्रियेला अडचणी येणार आहेत.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच्या वेळेस ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील देखील उपस्थित होते. दिड वर्षाच्या प्रर्दीघ प्रतिक्षेनंतर अखेर येत्या १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लागली आहे. त्यासाठी ११ मे रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या निवडणुकीत आता कॉंग्रेसची भुमिका महत्वाची ठरणार असली तरी देखील सभापती हा आमचाच होईल असा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु या निवडणुक प्रक्रियेवरच राष्टÑवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असून त्याचा अंमित निकाल हा येत्या २५ जून रोजी लागणार आहे. परंतु निकाल येण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेनेला याची घाई कशासाठी असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला आहे. त्यातही पालकमंत्र्यांनी ही निवडणुक घेण्यासाठी आग्रह केला असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आता पालकमंत्री ठाणे महापालिकेचा कारभार चालविणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुक घेतांना विरोधी पक्षाला देखील त्यात सहभागी करुन घेणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता हा केवळ मनमानी आणि चुकीचा कारभार केला जात असल्याचेही ते म्हणाले. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलानीक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवक करावी मगच सभापतीची निवडणुक घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने तौलानीक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. हाच मुद्दा आता हाताशी घेऊन राष्ट्रवादीने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.
वास्तविक पाहता स्थायी समिती सदस्यांची निवड ही तौलानीक संख्याबळानुसार झालेली नाही. त्याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे असतांना देखील थेट सभापतीपदाची निवडणुक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी दिला आहे.