एकनाथ शिंदे नेमके गुवाहाटीलाच का गेले? राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 09:07 PM2022-06-25T21:07:53+5:302022-06-25T21:08:47+5:30

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेला त्यातून बाहेर काढतील, असा विश्वास आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.

ncp anand paranjape big claims about why shiv sena rebel eknath shinde gone at guwahati only | एकनाथ शिंदे नेमके गुवाहाटीलाच का गेले? राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे नेमके गुवाहाटीलाच का गेले? राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

Next

ठाणे: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. याला राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच एकनाथ शिंदे नेमके गुवाहाटीलाच का गेले, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचेठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी एक गौप्यस्फोट केला. 

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा, कर्नाटक,  मध्यप्रदेश या राज्यांमध्येही भाजपची सत्ता आहे. पण, एकनाथ शिंदे हे गुवाहाटीलाच का गेले ? या मागेही एक कारण आहे. गुवाहाटी जवळच कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तंत्र-मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ते गुवाहाटीलाच गेले आहेत. हे आता त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाही समजले आहे, असे सांगून आनंद परांजपे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

शरद पवार यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही

शिवसेना हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष कसा चालवायचा हे त्यांना माहित आहे आणि ते सक्षमही आहेत. त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण, आमच्या आदरणीय नेत्यांवर टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही.  पवारसाहेबांवर टीका करणार्‍या श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी आपली लायकी तपासावी आणि नंतरच टीका करावी, असा घणाघाती टीका आनंद परांजपे यांनी केली. एकनाथ शिंदे समर्थकांनी आज शक्तिप्रदर्शन केले . यावेळी खा. श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी केलेल्या टीकेवर आनंद परांजपे  यांनी आक्रमक होऊन प्रत्युत्तर दिले. 

राष्ट्रवादीवर बेताल आणि बेछूट आरोप केले

श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर बेताल आणि बेछूट आरोप केले. खरंतर खा. शिंदे हे अपरिपक्व  आहेत, हे आपणाला माहिती होते. पण, त्यांना ठाणे जिल्ह्यातील राजकारणाविषयी पूर्ण माहिती नाही, हेदेखील आता त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या कुठल्याही कमिटीची पूर्तता केली नाही. सातत्याने राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचे काम हे पालकमंत्री शिंदे यांनी केले. नरेश म्हस्के म्हणाले की, राष्ट्रवादीचे नगरसेवक त्रास द्यायचे. पण, प्रत्येक महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना न बोलू देणे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना न बोलू देणे, विकास कामांमध्ये राजकारण करणे, किंबहुना कोरोनाकाळात लसीकरणातही राजकारण करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लस कमी देणे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारणही म्हस्के यांनी केले. 

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेला त्यातून बाहेर काढतील

सध्या शिवसेनेत जे चालू आहे. ते मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेला त्यातून बाहेर काढतील. शिवसेनेचाच मुख्यमंत्रीच या राज्यामध्ये राहिल, याबाबत तीळमात्रहीशंका नाही. पण, शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप आपण करू नयेत. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची ती लायकी नाही. आपण आपल्या पक्षात किती निष्ठावंत आहोत,हे दाखवण्याचा केविलवाणा  प्रयत्न म्हस्के करीत आहेत. नारायण राणे हे जेव्हा फुटले तेव्हा हेच म्हस्के सोबत गेले होते. कायमची त्यांची सवय आहे की जे फुटतात त्यांच्याबरोबर जातात आणि नंतर परत पक्षात येतात. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की पवारसाहेबांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही परांजपे यांनी दिला.
 

Web Title: ncp anand paranjape big claims about why shiv sena rebel eknath shinde gone at guwahati only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.