महावितरणकडून बदलापुरात मान्सूनपूर्व कामांना विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:19+5:302021-06-01T04:30:19+5:30
बदलापूर : पावसाळा तोंडावर आलेला असतानादेखील महावितरणने बदलापूर शहरातील विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या वृक्षांची छटाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे ...

महावितरणकडून बदलापुरात मान्सूनपूर्व कामांना विलंब
बदलापूर : पावसाळा तोंडावर आलेला असतानादेखील महावितरणने बदलापूर शहरातील विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या वृक्षांची छटाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे.
पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असतानाच बदलापूरमध्ये मात्र अजूनही महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केलेले दिसत नाही. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांत अनेक ठिकाणी मोठमोठ्या झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांमध्ये अडकून पडल्या आहेत. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यापूर्वी बदलापुरात नालेसफाई करणे, विद्युत तारांमध्ये अडकलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे अशा प्रकारची कामे पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अजूनही कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांमध्ये अडकल्याने पावसाळ्यात विद्युतपुरवठा खंडित होऊन एखादा मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे.
मागील आठवड्यात आलेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर काही भागांत तब्बल दोन दिवस विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मात्र यातून कोणताही बोध महावितरणने घेतलेला दिसत नाही. कारण आजही अनेक ठिकाणी विद्युततारांना झाडांचा स्पर्श होत असल्याचे पाहायला मिळत आहे, तर अनेक ठिकाणी विद्युतवाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा विळखा पडलाय. जर महावितरणने वेळीच या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली नाही तर येत्या पावसाळ्यात बदलापूरकरांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येणार आहे.
----------------