उल्हासनगरात रामदास आठवलेंच्या सभेला महायुतीचे बळ; स्थानिक भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांची उपस्थिती
By सदानंद नाईक | Updated: December 8, 2025 18:33 IST2025-12-08T18:33:53+5:302025-12-08T18:33:53+5:30
आठवले यांनी विरोधी पक्षावर टिका करून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याबाबत टिका केली.

उल्हासनगरात रामदास आठवलेंच्या सभेला महायुतीचे बळ; स्थानिक भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांची उपस्थिती
सदानंद नाईक, उल्हासनगर : रिपाई नेते व केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या सभेला स्थानिक भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांनि हजेरी लावल्याने, महायुतीचा नारा यावेळी देण्यात आला. आठवले यांनी विरोधी पक्षावर टिका करून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याबाबत टिका केली.
उल्हासनगर कॅम्प नं-३, गोलमैदान येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शेरो-शायरीच्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. तसेच महापालिका निवडणूकीचे बिगुल वाजल्याचे सांगून सभेत हजेरी लावलेल्या भाजप व शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्याकडे बघून इतर ठिकाणी काहीही राजकीय असलेतरी, येथे महायुती झाल्यात जमा असल्याचे सांगितले. महापालिकेत पक्षाच्या ७ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आल्याचा इतिहास असुन पक्षाची ताकद मोठी आहे. पक्षाच्या तिकिटावर पप्पू कलानी हे आमदार पदी निवडून आले होते. याची आठवण त्यानी करून दिली. मी तीन वेळा लोकसभा तर दोन वेळा राज्यसभेतुन खासदार झालो. यापुढेही ही प्रथा कायम राहणार असल्याचे आठवले म्हणाले.
महापालिका निवडणुकीत पक्षाला समाधाककारक जागा द्याव्या. असेही यावेळी महायुतीच्या नेत्यांना सुचविले आहे. आमदार कुमार आयलानी, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनीही यावेळी भाषण केले. आमदार सुलभा गायकवाड, भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, भाजपा निवडणुकीत समितीचे प्रमुख प्रदीप रामचंदानी, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन, रिपाईचे शहराध्यक्ष नाना बागुल, शांताराम निकम आदी नेते उपस्थिती होते. उल्हासनगरातील या सभेमुळे स्थानिक राजकारणात महायुतीमधील एकी आणि आगामी निवडणुकीसाठी रिपाईच्या जागावाटपाच्या अपेक्षांना बळ मिळाल्याचे चित्र आहे.
रविंद्र चव्हाण व श्रीकांत शिंदे यांची सभेला पाठ
रिपाई नेते व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी सभेला पाठ फिरविल्याने, महायुतीतील तिढा कायम असल्याच्या चर्चेला सुरवात झाली आहे.