डोंबिवलीनजीकच्या गावांत कमी दाबाने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:55 AM2021-02-25T04:55:27+5:302021-02-25T04:55:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहराला लागून असलेल्या भोपर, नांदिवली, सागाव, सांगर्ली, सोनारपाडा, कोळे आदी भागांना मागील काही दिवसांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहराला लागून असलेल्या भोपर, नांदिवली, सागाव, सांगर्ली, सोनारपाडा, कोळे आदी भागांना मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिकेने बुधवारी पुन्हा एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन योग्य दाबाने पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.
यंदा पुरेसा पाऊस झाला असतानाही डोंबिवलीनजीकच्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. मागील दोन दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने केडीएमसीच्या ‘ई’ व ‘आय’ प्रभागांतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एमआयडीसीला पत्र देत आहेत. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे भोपर येथील भाजपचे पदाधिकारी अमर माळी म्हणाले.
पाणीप्रश्नाबाबत नागरिक सातत्याने तक्रारी घेऊन येत आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी स्वतःहून ५०० सह्यांचे निवेदन दिले आहे. पण, त्यानंतरही काहीच फरक पडलेला नाही. रोज पाण्याचा दाब मोजून तो सोशल मीडियाद्वारे जाहीर केला जातो. मानपाडा आणि कोळे जंक्शन येथून पाणी वितरित होते. त्यापैकी मानपाडा येथील शनिमंदिर भागातून ते पाणी येते. तेथील व्हॉल्व्हमधून कमी दाबाने पाणी सोडण्यात येते. तेथून पुरेशा दाबाने पाणी सोडल्यास मुबलक पाणी मिळेल, असे माळी म्हणाले.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची भीती
पाणीप्रश्नावरून नागरिकांचा रोष, तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याची काळजी घ्यावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही महापालिकेने एमआयडीसीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
-------------