‘मरे’वर १३२ फेऱ्यांची कमतरता
By Admin | Updated: August 30, 2015 23:24 IST2015-08-30T23:24:08+5:302015-08-30T23:24:08+5:30
वाढती प्रवासीसंख्या आणि रोजचीच लटकंती यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. मध्य रेल्वेची स्थिती अधिक बिकट असून, ही समस्या दूर

‘मरे’वर १३२ फेऱ्यांची कमतरता
सुशांत मोरे, मुंबई
वाढती प्रवासीसंख्या आणि रोजचीच लटकंती यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. मध्य रेल्वेची स्थिती अधिक बिकट असून, ही समस्या दूर करण्यासाठी लोकल आणि फेऱ्यांमध्ये वाढ करणे अपरिहार्य आहे. सध्या मध्य रेल्वेची मेन लाइन आणि ट्रान्स हार्बरवर १३२ फेऱ्यांची कमतरता आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मध्य रेल्वेचा पसारा हा सीएसटीपासून कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत आहे. हार्बरचा पनवेल आणि अंधेरी तर ट्रान्स हार्बरचा ठाणे ते पनवेलपर्यंत आहे. या सर्व मार्गांवरून सध्या १४२ लोकलमधून ४१ लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही वर्षांतील प्रवासीसंख्येशी तुलना केली असता यात बरीच वाढ झाली आहे. २000-२00१ दरम्यान २७ लाख २0 हजार प्रवासी मध्य रेल्वेवरून प्रवास करीत होते. गेल्या १५ वर्षांत यात जवळपास १३ लाख ८0 हजार प्रवाशांची भर पडली आहे.
या वाढत्या गर्दीचा प्रवास सुकर करण्यासाठी अधिक लोकलची गरज आहे. मेन लाइनवर ठाणे ते कर्जत, खोपोलीदरम्यान आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते पनवेल, वाशीदरम्यान प्रवासीसंख्येत बरीच वाढ झाली आहे. हे पाहता एकूण आठ लोकलची कमतरता मध्य रेल्वेला भासत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. यात मेन लाइनवर चार आणि ट्रान्स हार्बरवर चार लोकल कमी पडत असून, एकूण १३२ फेऱ्यांची कमतरता आहे. या फेऱ्या वाढल्यास मेन लाइनवर ठाण्यापुढील डाऊन दिशेला आणि ट्रान्स हार्बरवर बराच ताण पडत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सर्व बम्बार्डियर लोकल येणार असून, मध्य रेल्वेला सिमेन्स लोकल मिळतील आणि यातील काही लोकल आल्यावर बराचसा ताण कमी होऊ शकतो, अशी आशा अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली.