‘जागृती’, ‘शिवनेरी’च्या मूर्ती ठरल्या सर्वोकृष्ट
By Admin | Updated: September 14, 2016 04:22 IST2016-09-14T04:22:05+5:302016-09-14T04:22:05+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश दर्शन’ स्पर्धेत कल्याण बेतुरकरपाडा येथील ‘जागृती गणेशोत्सव मंडळ’ आणि डोंबिवलीतील ‘शिवनेरी मित्र मंडळा’च्या

‘जागृती’, ‘शिवनेरी’च्या मूर्ती ठरल्या सर्वोकृष्ट
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश दर्शन’ स्पर्धेत कल्याण बेतुरकरपाडा येथील ‘जागृती गणेशोत्सव मंडळ’ आणि डोंबिवलीतील ‘शिवनेरी मित्र मंडळा’च्या मूर्तींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. तसेच सजावटीकरिता कल्याण पश्चिमेकडील ‘विजय तरूण मंडळ’ आणि डोंबिवली पूर्वेतील ‘स्रेहांकित मित्र मंडळा’ला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
गणेश दर्शन स्पर्धेत ४९ मंडळांनी सहभाग नोंदविला होता. गणेश मूर्ती आणि सजावट या दोन निकषांवर निवड करण्यात आली. गणेशमूर्ती करीता दिलेल्या पारितोषिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी कल्याणमधून ‘दूधनाका गणेशप्रेमी मंडळ’ तर डोंबिवलीतून ‘जोशी मित्र मंडळ’ यांची निवड झाली. कल्याण बाजारपेठ परिसरातील ‘श्री विष्णू मंदिर गणेशोत्सव’ तर डोंबिवलीमधील ‘गोग्रासवाडी गणेशोत्सव मंडळ’ यांच्या मूर्तींना तिसरा क्रमांक मिळाला आहे. ‘बालवीर मित्र मंडळ’ आणि ‘प्रबोधन मित्र मंडळ’ या कल्याणमधील तर डोंबिवलीतील ‘बाळ गोपाळ मंडळ’ आणि ‘शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळां’च्या मूर्तींना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.
सजावटीसाठी ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘पर्यावरण’ हे विषय महापालिकेने दिले होते. यात द्वितीय क्रमांक कल्याणच्या सुभाष चौकातील ‘मुरारबाग मित्र मंडळ’ आणि डोंबिवली पश्चिमेतील ‘अष्टविनायक मित्र मंडळा’ने पटकाविला आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कल्याणच्या लेले आळीतील ‘श्री गणेशोत्सव मित्र मंडळ’ तर डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानाच्या ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला जाहीर झाले आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिकाने कल्याण पूर्वेतील ‘विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’, पश्चिमेतील ‘श्री स्पोर्टस क्लब गणेशोत्सव मंडळ’ तर डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली रोडवरील ‘एकता मित्र मंडळ’ आणि राजाजी पथावरील ‘राजाजी पथ गणेशोत्सव मंडळा’ला गौरविण्यात येणार आहे. महापौरांचे विशेष पारितोषिक कल्याण पूर्वेकडील ‘नवयुग मित्र मंडळा’ला जाहीर झाले आहे.
या स्पर्धसाठी वैशाली कांदळगांवकर, मिनल लेले, ललित किरंगे, व्यंगचित्रकार गणेश जोशी यांनी परीक्षक तर संयोजक म्हणून भिकू बारस्कर यांनी काम पाहिले.