हुश्श, अर्धी पाणीकपात मागे
By Admin | Updated: May 7, 2017 06:07 IST2017-05-07T06:07:24+5:302017-05-07T06:07:24+5:30
मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के

हुश्श, अर्धी पाणीकपात मागे
सुरेश लोखंडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मे महिन्यातील उन्हाचे पोळून काढणारे चटके सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के पाणीकपात अचानक निम्म्याने कमी करून ७ टक्के केल्याने उन्हाच्या झळा सोसणाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा मात्र तुलनेने कमी सोसाव्या लागणार आहेत.
गतवर्षी चांगला पाऊस होऊनही लागू केलेल्या १४ टक्के पाणीकपातीमुळे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांमधील गृहिणींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने अचानक कपात ७ टक्क्यांवर आणल्याने महिलांना सुखद धक्का बसला आहे. आतापर्यंत महिनाभरात चार दिवस पाणीकपात लागू होती. आता महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांना केल्या आहेत.
पाणीटंचाईचा यापूर्वीचा कटू अनुभव लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यापासूनच वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यात आले होते. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवणे आवश्यक असल्यामुळे जादा पाणी उचलणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले होते. पाण्याचे आॅडिट करून काही महापालिकांना दंडासह पाणी बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. सुमारे १० टक्क्यांपर्यंत जादा पाणी उचलण्यास अनुमती देताना महापालिकांनी त्या बदल्यात आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण निश्चित केले होते. डिसेंबरपासून ७ टक्के लागू केलेली पाणीकपात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात १४ टक्के करण्यात आली. परिणामी, महिन्यातून चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता.
आता धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ही कपात ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत दुप्पट साठा धरणात आहे. त्यामुळे ऐन मे महिन्याच्या कडकडीत उन्हाळ्यात कपात कमी करून दिलासा दिला आहे. बारवी धरणासह उल्हासनदी, बदलापूर बंधारा आणि मोहने बंधारा यातून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांची पाणीकपात ७ टक्क्यांनी कमी केली आहे. परिणामी, महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण एमआयडीसी, एमजेपी, शहाड-टेमघर आणि महापालिकांच्या पाणीपुरवठा यंत्रणांकडून अवलंबले जाणार आहे.
निवडणूक काळात राजकीय नेत्यांनी कपात रद्द करून जादा पाणीपुरवठ्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. ‘शहरात येणारे जादा पाणी रहिवाशांऐवजी अवैध धंदे, बांधकामे, कारखाने, हॉटेलवाले यांना जात आहे’, असे खडे बोल गृहिणींनी राजकीय नेते व उमेदवार यांना सुनावले होते. कपात रद्द झाली असली तरी नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्याएवढेच पाणी आताही उचलावे लागणार आहे. त्यानुसार, आम्ही महापालिकांना पाणीपुरवठा करीत आहोत.
- विवेकानंद चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, शहाड-टेमघर
पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा दनघमीमध्ये आजचा साठा, टक्केवारी आणि मागील वर्षी आजच्या दिवसाच्या पाणीसाठ्याची टक्केवारी
धरणएकूण साठा आजचा साठायंदाची % मागीलवर्षाची %
भातसा९४२.१०४१२.७८४३.८१३७.२२
मोडक१२८.९३८२.२८६३.८२१२.४६
तानसा१४५.०८४८.२८३३.२८३०.१८
बारवी१८०.०३१०२.११४३.८११९.९१
आंध्रा३३९.१४९६.००२८.३११४.५२