भिवंडीतील गायत्रीनगर तणावाखालीच
By Admin | Updated: October 14, 2016 06:32 IST2016-10-14T06:32:28+5:302016-10-14T06:32:28+5:30
मोहरमच्या मिरवणुकीवेळी भिवंडीत बुधवारी निर्माण झालेला तणाव, कमानी तोडण्याची घटना आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात

भिवंडीतील गायत्रीनगर तणावाखालीच
भिवंडी : मोहरमच्या मिरवणुकीवेळी भिवंडीत बुधवारी निर्माण झालेला तणाव, कमानी तोडण्याची घटना आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात ३६ जणांची धरपकड केली. रात्री उशिरापर्यंत हे सत्र सुरू होते. आधी कमानी उभारू देण्याबाबत कोणताच आक्षेप न घेणाऱ्या पोलीस आणि प्रशासनाने या तणावानंतर कमान उभारणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल केले. शांतता कमिटीच्या बैठकीनंतरही तणाव कमी न झाल्याने गायत्रीनगर, रामनगर भागात दुसऱ्या दिवशी घबराटीचे वातावरण होते.
दोन गटातील दगडफेक, पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या घटनांनुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत. रामनगर भागातील मन्सूरबाग व फातमानगरमधील ताबुतांची मिरवणूक काढल्यावर ते ठंडा (दफन) करण्यासाठी चिस्तीया मशिदीकडे नेले जातात. ती मिरवणूक गायत्रीनगरच्या सिध्देश्वर श्ांकर मंदिरासमोर आली असता मिरवणुकीतील जमावाने मंदिरावर दगडफेक केली. चपला फेकून धार्मिक भावनांचा अपमान होणारे कृत्य केले. पोलिसांवर दगडफेक केली. नवरात्रोत्सवासाठी उभारलेल्या स्वागत कमानी तोडल्याने त्यावरील दुर्गादेवीचे चित्र असलेले बॅनर जमिनीवर पडून पायदळी तुडवले गेले. त्यातून धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे जमावाची पळापळ सुरू झाली. दहशत पसरली. घरेदारे, दुकाने बंद झाली. या घटनेला जबाबदार असलेले गुलशन इद्रीस फारूकी, सोनु काल्या, त्याची आई, समीम डोसावाला, रफीक बंदेनवाज शेख, अफरोज मोहम्मद सिध्दिकी, फैयाज जाफर खान, मोहम्मद अफरार शेख अशा १२ जणांसह ५० ते ६० जणांच्या जमावाविरोधात शांतीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चिस्तीया मशिदीकडून मिरवणुकीतील जमाव फातमानगरकडे परतत असताना त्यांच्यावर चपला व दगडफेक केल्याप्रकरणी नवनाथ माने, दादासाहेब कव्हर व त्यांच्यासोबतच्या जमावाविरोधातही गुन्हा नोंदवला.
गायत्रीनगर हनुमान मंदिरासमोर सार्वजनिक मार्गावर स्वागत कमानी उभारल्याप्रकरणी दीपक ठाणेकर, विकास निकम, शरद धुळे यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)