श्रीनगर बेघर करण्याचे चार वर्षे प्रयत्न
By Admin | Updated: May 26, 2016 03:13 IST2016-05-26T03:13:52+5:302016-05-26T03:13:52+5:30
घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती

श्रीनगर बेघर करण्याचे चार वर्षे प्रयत्न
ठाणे : घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट घातला गेला. मात्र त्याला विरोध झाला. त्यानंतर दोन वर्षांपूर्र्वी देखील पालिकेने या इमारती धोकादायक ठरवण्याच्या हालचाली केल्या. यंदा पुन्हा तसा प्रयत्न झाल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत.
कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत ठाण्यातील श्रीनगर येथील जमिनीचा विकास होऊन इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. शासनाच्या या कायद्याचे विकासकाने धिंडवडे काढल्यामुळे येथील सदनिका भूमिहीन लोकांच्या पदरात पडल्या नसल्याचा गंभीर आरोप यापूर्वी झालेला आहे. १९८६ ते १९९२ पर्यंत इमारतींचे काम पूर्ण होऊन रहिवासी वास्तव्यास आले. सेक्टर २ सर्व्हे क्र. ४२७ ते ४८५ येथील भूभागावर केवळ २० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट मागील चार वर्षांपासून घातला आहे.
महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करतो. या यादीमध्ये २०१३ मध्ये श्रीनगर सेक्टर २ सर्व्हे क्र मांक ४२७ ते ४८५ चे मालक म्हणून काँग्रेसच्या एका नेत्याचे नाव प्रसिध्द करण्यात आले होते. विशेष म्हणजे या यादीत श्रीनगर मधील एकही इमारतीचे नाव नव्हते. याबाबत वागळे प्रभाग कार्यालयातून अधिक माहिती घेतली असता धोकादायक इमारत फाईलमध्ये त्यावेळी या राजकीय नेत्याच्या खाजगी कंपनीचे दुमजली कार्यालय धोकादायक असल्याची नोंद केलेली होती. त्यावेळीच श्रीनगर वसाहत धोकादायक घोषित करण्याबाबत रहिवाशांनी सहाय्यक आयुक्ताकंडे आक्षेप नोंदवला होता. परंतु तरीही लागलीच पुढच्या वर्षी २०१४च्या धोकादायक इमारतींच्या यादीत पुन्हा श्रीनगर वसाहत धोकादायक जाहीर केली. यंदा कुठलीही नोटीस न देता पुन्हा इमारती धोकादायक ठरवल्या. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत.
या इमारती ५४ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभ्या असून सध्या या इमारतींमधील जागा प्रति चौ.फू. १५ हजार रुपये दराने विकली जात आहे. या इमारती धोकादायक ठरवून तेथे टॉवर उभे केले तर किमान अडीच लाख चौ.फू.चे बांधकाम केले जाऊ शकते. सध्यापेक्षा जास्त दराने नव्या फ्लॅटची विक्री होणार हे उघड असले तरी सध्याचा १५ हजार प्रति चौ.फू. याच दराने फ्लॅट विकले गेले तरीही श्रीनगर वसाहतीचा पुनर्विकास राजकीय नेते व बिल्डर यांच्याकरिता किमान ३५०० कोटी रुपयांची उलाढाल असेल. त्यामुळे या इमारतींवर गेली चार वर्षे डोळा असण्यामागे हे अर्थकारण हेच कारण आहे. श्रीनगरमधील रहिवासी जागरूक असल्याने व यापूर्वी दोनवेळा त्यांच्या इमारती धोकादायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी महापालिकेतील गोल्डन गँगच्या कारवायांविरुद्ध आवाज उठवल्यावर नजरचुकीने इमारती धोकादायक ठरवल्या गेल्याची सारवासारव अधिकारी करु लागले आहेत. मात्र एक-दोन नव्हे तर चक्क ४५ इमारती धोकादायक ठरवणे ही नजरचूक असूच शकत नाही, असे रहिवाशांचे मत आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवकाची मृत आई झाली मालमत्ताधारक
विशेष म्हणजे २०१३, २०१४ च्या धोकादायक यादीत किसननगरमध्ये असलेल्या एका काँग्रेस नगरसेवकाच्या धोकादायक इमारतीच्या मालमत्ताधारक यादीतून अचानक नगरसेवकाचे नाव काढून त्यांच्या मयत आईचे नाव २०१५ च्या यादीत टाकण्यात आले. ही बाब उघड झाल्यावर आता ही चूकही पालिकेकडून मान्य केली गेली. अशा अक्षम्य चुका करणाऱ्यांवर आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कोणती कारवाई करतात याकडे श्रीनगरमधील रहिवाशांसह ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.