यंदाही मच्छिमारांची घरे धोक्यात
By Admin | Updated: June 20, 2016 01:55 IST2016-06-20T01:55:30+5:302016-06-20T01:55:30+5:30
सातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील

यंदाही मच्छिमारांची घरे धोक्यात
हितेन नाईक, पालघर
सातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील २-३ वर्षापासून धूळखात पडून आहे. त्यामुळे या पावसाळयातही किनाऱ्यांलगतच्या घरांना उधाणाच्या लाटाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा १४ कोटी पैकी ५ कोटीच्या पहिल्या टप्प्याच्या निधीचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पडून आहे.
सातपाटी गावाच्या पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छिमारांची अनेक घरे समुद्राला आलेल्या तुफानी वादळ वारे आणि भयंकर लाटांच्या तडाख्याने उध्वस्त झाली होती. सहकारी संस्थांच्या मागणीवरून तत्कालीन केंद्रिय पेट्रोलियम मंत्री व बिहारचे विद्यमान राज्यपाल राम नाईक यांच्या प्रयत्नाने सोळाशे मीटर बंधाऱ्याला मान्यता मिळून २ फेब्रुवारी २००३ साली हा बंधारा लोकार्पित करण्यात आला होता. मागील १३ वर्षा पासून ऊन, पाऊस, वादळी वारे आणि महाकाय लाटांचे तडाखे झेलीत हा बंधारा उभा असून त्याची आता पडझड झाली आहे. या बंधाऱ्याचे दगड समुद्रात वाहून गेल्याने बंधाऱ्या ला भगदाडे पडली आहेत. तर बंधाऱ्या वरून खाली उतरण्या साठी बांधण्यात आलेले रॅम्प (पायऱ्या) तुटल्याने महिला वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र गवितांनी मेरी टाईम बोर्डाकडून निधी आणून दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही केली होती. त्या नंतर काही दिवसात पुन्हा हे काम बंद पडले ते आजपर्यंत बंदच आहे. त्या नंतर बंधाऱ्याच्या दुरुस्तीची अनेक आश्वासने निवडणूकी पूर्वी सातपाटीकरांनी ऐकली असून हि आश्वासने हवेत विरल्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून या जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यातील कळंब (दीड कोटी), अर्नाळा (दीड कोटी), सातपाटी (पाच कोटी), नवापूर(दीड कोटी), तारापूर (दोन कोटी), घिवली(दीड कोटी), एडवन (दीड कोट), डहाणू-बुरुज पाडा(दीड कोटी), गुंगवाडा (दीड कोटी), तडीयाळे (दीड कोटी), धाकटी डहाणू (एक कोटी), नरपड (एक कोटी), ई, १२ बंधाऱ्या च्या कामाचे निधी चे प्रस्ताव तांत्रिक मान्यते साठी सरकार दरबारी पडून आहेत.त्यातील धाकटी डहाणू आणि नरपड ह्या आमदार अमित घोडा यांच्या तालुक्यातील कामाचे टेंडर होऊन कामाची वर्क आॅर्डर मिळाल्याची माहिती पतन विभागाच्या कार्यालयातुन मिळाली आहे. सातपाटी सह बाकीच्या किनारपट्टी वरील लोकांच्या घरांना समुद्राच्या महाकाय लाटा धडका देत असल्याने या कामाची वर्कआॅर्डर निघणे अत्यावश्यक असताना ही बाब धूळ खात का पडून आहेत असा प्रश्न मच्छीमार विचारू लागले आहेत.